एसआरए प्रकल्प प्राधिकरण स्वत: पूर्ण करणार

यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Jun 19, 2017, 12:19 AM IST
एसआरए प्रकल्प प्राधिकरण स्वत: पूर्ण करणार title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील सुमारे दोनशेहून अधिक एसआरए प्रकल्प हे सोसायटींमधील अंतर्गत वादामुळं पूर्ण होत नाहीत. ज्यामुळं अनेक प्रामाणिक आणि गरजू लोक घरापासून वंचित राहिलेत. यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची नेमणूक करताना क्वचितच एका नावावर सहमती होते, अन्यथा विकासक नेमण्यावरून सोसायट्यांमध्ये दोन तीन गट पडल्याचे सर्रास चित्र पहायला मिळते. ज्यामुळं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने बांधकाम परवाना दिल्यानंतरही 8-10 वर्षे प्रकल्प रखडलेले आहेत. 

एकाच एसआरए प्रकल्पात दोन तीन बिल्डरांनी रस दाखवल्यानंतर अशा प्रकारचे चित्र निर्माण होते. यात भांडखोर सभासद वाद घालत बसतात, परंतु सामान्य गरजू रहिवाशी मात्र घरापासून वंचित राहतायत. त्यामुळंच एसआरएनं असे रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय. 

बिल्डरांनीही सुमारे 400 हून अधिक एसआरए प्रकल्प रखडवलेले आहेत. ज्यांना एसआरएनं नोटीसा पाठवून प्रकल्प सुरु करण्याची मुदत दिली आहे. अन्यथा बिल्डर बदलण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. मुंबईत एसआरए प्रकल्प पूर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळं आता रखडलेले प्रकल्प तरी मार्गी लागावेत यासाठी प्राधिकरण प्रयत्न करत आहे.

अनेक वर्षे घरांचे स्वप्न पाहणा-या रहिवाशांसाठी नक्कीच हा दिलासा आहे. आता एसआरएनं या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही वर्षे वाट पाहू नये म्हणजे झालं.