छातीत खरंच राम आहे ना... मग बडवता कशाला?

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत.

Updated: Mar 9, 2020, 08:30 AM IST
छातीत खरंच राम आहे ना... मग बडवता कशाला? title=

मुंबई: आमची छाती फाडली तरी आमच्या छातीत राम दिसेल, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमिया पाटील उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीनंतर छात्या बडवत आहेत. परंतु, तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. अन्यथा श्रीरामाला त्रास होईल, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरे ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे,सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत. काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही. त्यामुळे विरोधक बेजार झाले आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत आहेत. मध्यंतरी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. 

तेव्हादेखील शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता त्यांची फक्त जीभच नव्हे तर बरेच काही सटकल्याचे दिसत आहे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हापासून शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत आहे, असे शिवसेनेने म्हटले होते.