सरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा

कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 29, 2017, 09:16 AM IST
सरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा  title=

मुंबई : कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने श्रेयासाठी घाईगडबड केली. त्यामुळे कर्जमाफीसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचा खेळखंडोबा झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहीलेल्या लेखात ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
'सामना'तील महत्त्वाचे मुद्दे

- शेतकरी कर्जमाफी हा लाखो शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला तरी राज्यकर्त्यांसाठी तो श्रेयाचा झाला आहे.

- श्रेय आले की घाई येते आणि घाई झाली की गडबड ही होतेच होते. शेतकरी कर्जमाफीचीदेखील राज्य सरकारने घाईगडबडच केली आहे. त्यामुळेच सरकार रोज कर्जमाफीचे नवनवीन ‘वायदे’ करीत आहे.

- श्रेयाची घाई कशी गडबड करते, त्याचा फटका सामान्य जनतेला कसा बसतो आणि एका ज्वलंत व जिव्हाळय़ाच्या प्रश्नाचा कसा खेळखंडोबा होतो याचे ‘उत्तम’ उदाहरण म्हणून या कर्जमाफी गोंधळाकडे पाहावे लागेल.

-‘कर्जमाफी नको, पण तुमचा ऑनलाइन गोंधळ आवरा’ अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.