'साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री', आमदारांची आदित्य ठाकरेंना साद

शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे.

Updated: Oct 26, 2019, 02:39 PM IST
'साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री', आमदारांची आदित्य ठाकरेंना साद title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयी आमदारांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं असा सूर विजयी आमदारांमध्ये उमटला. आदित्य ठाकरेंनी वरळीत मोठा विजय मिळवला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये त्यात वाघाच्या हाती कमळ दाखवण्यात आलंय. तसंच वाघाच्या गळ्यात घड्याळही दिसतं आहे. व्यंगचित्रकाराची कमाल...बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शनही राऊतांनी दिलं आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जातं आहे. त्यामुळेच वरळीतून जिंकून आल्यानंतर शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचं वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन काल अशा आशयाचे बॅनर्स वरळीत लावले होते. तर आज प्रभादेवी परिसरात आता यंग सोच विन्स अशा आशयाचे पोस्टर्स लागल्याचं पहायला मिळतं आहे.

दुसरीकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेनं विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना बंडखोर आमदार आशिष जयस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. निवडणुकीत अपक्ष लढलो असलो तरी आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचं या अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. तर दुसरीकडे १५ पेक्षा जास्त निवडून आलेले अपक्ष आणि बंडखोर भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये बंडखोरांना आपल्याकडे वळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर १३ ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. एमआयएमला २, बहुजन विकास आघाडीला ३, सीपीएमला १, जनसुराज्य शक्तीला १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, मनसे १, शेकापला १, प्रहारला २, रासप १, समाजवादी पक्ष २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली आहे.