'महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल', सेनेचा भाजपला टोला

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

Updated: Oct 30, 2019, 03:17 PM IST
'महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल', सेनेचा भाजपला टोला title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 'सामना'चा अग्रलेख डॅमेज कंट्रोल नसल्याचेही राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेला अजूनही उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केल्यास भाजप चर्चेसाठी तयार आहे, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपद पाच वर्षे स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे. 

दरम्यान, शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता एकमेकांना इशारेबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेकडे अन्य पर्याय आहेत पण ते आम्ही वापरणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तर पर्याय भाजपकडेही आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले आहे. त्यामुळे युतीमधील वाद मिटण्याचा आणि तणाव निवळण्याचा नाव घेत नाही.

राज्यात नवे सरकार बनायचे तेव्हा बनेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. 'कुंडलीच्या हिशोबाने सरकार स्थापन होणार' असेही ते म्हणाले. दिवाळीपूर्वीच निकाल लागूनही अजूनही युतीने सत्तेसाठी दावा केलेना नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणही नसल्याचं मत असं मत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. झी २४ तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता  बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे. उद्याच्या या बैठकीत भाजपसाेबत सत्तेत जाण्यासंदर्भात तसेच विधिमंडळ नेता निवडीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आज शिवसेना नेत्यांची माताेश्रीवर खलबते सुरु झाली आहेत. काल भाजपसाेबतची बैठक रद्द केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा होत आहे. नेते संजय राऊत, अनिल देसाई, शिवाजीराव आढळराव, विजय औटी या बैठकीला उपस्थितीत आहेत. तर आणखी काही शिवसेना नेते माताेश्रीवर येत आहेत. त्यामुळे या बैठकीची माहिती मीडियाला मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.