Rajyasabha Election : आतापर्यंत 278 आमदारांचं मतदान, वेळेआधीच मतदान पूर्ण होण्याची शक्यता

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई 

Updated: Jun 10, 2022, 02:30 PM IST
Rajyasabha Election : आतापर्यंत 278 आमदारांचं मतदान, वेळेआधीच मतदान पूर्ण होण्याची शक्यता title=

Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे. दोघांसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 278 आमदारांचं मतदान पूर्ण झालं असून आता केवळ 9 आमदार मतदान करण्याचे बाकी आहेत. त्यामुळे वेळेआधीच मतदान पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानात एकही मत बाद झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली.  दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मत बाद ठरवले जावे, अशी मागणी भाजपने केली. पण ही मागणी निवडणुक अधिकाऱ्यांनी फेटाळाली. 

भाजपने का घेतला आक्षेप
भाजपने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. 

पण जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली होती.

एमआयएमचा मविआला पाठिंबा
राज्यसभा निवडणुकीत एमआयएमनं महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केलाय. खासदार इम्तियाज जलिल यांनी ही घोषणा केलीये. मविआला पाठिंबा देत असलो तरी शिवसेनेसोबत आमचे राजकीय, वैचारिक मतभेद कायम असतील असं त्यांनी म्हटलंय. धुळे आणि मालेगावमधील एमआयएमच्या आमदारांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी काही अटी घातल्या आहेत. तसंच एमपीएससीमध्ये अल्पसंख्याक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केलीये..

मत वाया जाऊ नये साठी पराकाष्ठा
गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक  यांना मतदानासाठी विधान भवनात आणण्यात आलं आहे. पुण्याहून एअर लिफ्ट करुन त्यांना मुंबईत भल्या सकाळीच आणण्यात आलंय. तर दुसरीकडे भाजप आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईत दाखल झालेत झालेत. कार्डियाक अॅम्ब्युलन्सह डॉक्टरांचं पथक त्यांच्या सोबत आहेत.. स्वता देवेंद्र फडणविसांनी त्यांचं स्वागत केलं.  राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.