'राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून वाढ की थट्टा?' पाहा कुणी केला हा सवाल

धमकीचं पत्र आल्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ, पण सुरक्षा वाढीवर सवाल

Updated: May 13, 2022, 05:47 PM IST
'राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून वाढ की थट्टा?' पाहा कुणी केला हा सवाल title=

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना धमक्यांची पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण या सुरक्षा वाढवण्यावरुन मनसेने टीका केली आहे.  

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत धार्मिकस्थळांवरील भोंग्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सभा घेत आपली भूमिका आक्रमतेनं भाषणातून मांडली. मशिदीवरील भोंग्यातून होणारी अजान थांबवा, अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू ही भूमिका घेण्यात आली होती. 

भोंग्याच्या विषय आल्यापासून आम्हाला धमक्या येत असल्याचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgoakar) यांनी केला होता. याचसंदर्भात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांची भेट घेत राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. 

त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

पाहूया कशी असणार राज ठाकरे यांची सभा?
राज ठाकरे यांना याआधीच Y + दर्जाची सुरक्षा, त्यात वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार त्यांच्या सुरक्षेत 1 पोलीस अधिकारी आणि एक अंमलदार वाढवण्यात आलेत.

वाढीव सुरक्षेवर मनसे नाराज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली की थट्टा केली आहे, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. ज्यांना गरज गरज नाही, ज्यांनी कधी माशी मारली नाही त्यांना मोठी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे अशी टीकाही नांदगावकर यांनी केली आहे. जीवे मारण्याची धमकी असताना 1 पोलीस अधिकारी आणि एक अंमलदार वाढवता ही थट्टा आहे, पूर्वी झेड सुरक्षा व्यवस्था होती ती कमी करण्याचं कारण काय? असा सवाल नांदगावकर यांनी विचारला आहे.

राज ठाकरे यांना धमकीचं पत्र
तीन चार दिवसांपूर्वी  मनसे नेते बाळा नांदगावर यांच्या कार्यालयात धमकीचं एक पत्र आलं होतं. भोंग्याचा विषय झाल्यापासून धमक्या येत आहेत, त्यापैकीच एक पत्र आल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं. यात राज ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्र कोणी पाठवलं याबाबत काही माहिती नाही, पण ते पत्र पोस्टाने आलं. या पत्रानंतर गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत तातडीची पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती नांदगावकर यांनी दिली आहे.