स्वकीयांवर केलेल्या 'त्या' आरोपांवरून प्रकाश मेहतांचं घुमजाव

एसआरएप्रकरणी अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांनी स्वपक्षीयांवर केलेल्या आरोपांवर घूमजाव केलं आहे.

Updated: Aug 2, 2017, 05:08 PM IST
स्वकीयांवर केलेल्या 'त्या' आरोपांवरून प्रकाश मेहतांचं घुमजाव title=

मुंबई : एसआरएप्रकरणी अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांनी स्वपक्षीयांवर केलेल्या आरोपांवर घूमजाव केलं आहे. आपण कुठलेही प्रसिद्धीपत्रक काढले नसल्याचा दावा प्रकाश मेहतांनी केलाय. जी काही भूमिका मांडायची होती ती सभागृहात मांडलेली असल्याचं मेहतांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या आरोपांचेही मेहतांनी खंडन केलंय.

आपला राजीनामा घ्यायचा की नाही त्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मेहतांनी प्रसिद्धीपत्रकातून स्वपक्षीयांवर खळबळजनक आरोप केले होते.

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी स्वपक्षीय आणि मंत्रिमंडळातील सहकारीच षडयंत्र करत असल्याचा धक्कायदाय आरोप मेहतांनी केला होता. त्यामुळे सरकारमध्ये सारंकाही आलबेल सुरू नसल्याचं पुढं आलं. आपल्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून पक्षातले पदाधिकारीच टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता.

काय आहे नेमकं प्रकरण?

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.

बिल्डरला ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली.

त्या फाईलवर चुकून शेरा दिल्या असून दुसऱ्या दिवशी ती फाईल एसआरएला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केला. मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत दिली.

याप्रकरणी जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला अडणीत आणले आणि ही यांची पारर्दशकता असल्याचे म्हटले. प्रकाश मेहतांच्या घोळामुळे भर सभागृहात सरकाराची नाचक्की झालेय. एसआरए प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. मेहताच्या निष्काळजीपणामुळे बिल्डरला ५०० कोटींचा फायदा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.