मुंबईत संततधार सुरु, रेल्वे वाहतुकीवर परिणाम; पुढील काही तासात अति मुसळधार पाऊस

Rain In Mumbai Update : शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय आहे. 

Updated: Jul 5, 2022, 10:35 AM IST
मुंबईत संततधार सुरु, रेल्वे वाहतुकीवर परिणाम; पुढील काही तासात अति मुसळधार पाऊस title=

मुंबई : Rain In Mumbai Update : शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय आहे. आज सकाळपासूनच मुंबईत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. मुंबईची पश्चिम रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र, मध्य आणि हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास कर्मचाऱ्यांना लेट होत आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढला,सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात,कुर्ला पूर्व नेहरूनगर,कुर्ला पश्चिम एल बी एस रोड,चेंबूर,टिळकनगर, विध्याविहार, या भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, विक्रोळी येथे दरड कोसळली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातही पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. पाऊस असाच बरसल्यास सखल भागात आणखी पाणी भरणार आहे. मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरातही पावसाचा जोर पहायला मिळतोय. पावसाच्या सरी अंगावर झेलत मॉर्निंग वॉकसाठी नागरिक आल्याचं पाहायला मिळत आहे. तर  भांडूप परिसरात जोरदार पाऊस सुरूंय. एलबीएस मार्गावर पावसामुळे पाणी साचलंय. एलबीएस मार्गावर वाहतूक मंदावली आहे. 

दरम्यान, येत्या 4-5 दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रात्रभर जोरदार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणीच पाणी दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावत आहेत. सीएसएमटी-ठाणे सेक्शनमध्ये खूप पाऊस पडत असल्याने मेनलाइनवर काही ट्रेन्स 10-15 मिनिटाने धावत आहे. दरम्यान, ट्रान्स हार्बर व नेरूळ, बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरु आहेत.

पनवेलमध्ये काल पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खांदेश्वर रेल्वे स्थानकात रात्री पाणी शिरले होते.  प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पाणीचपाणी होतं. त्यातून वाट काढत प्रवासी बाहेर पडत होते. रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी मोटर लावून पाणी बाहेर काढत होते. पण या साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती.

कल्याणमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आडीवली-ढोकली परिसरातल्या चाळींमध्ये पाणी शिरलं. कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. समर्थ नगर, ऑस्टिन नगरच्या चाळींमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत,  परिसरातल्या नाल्यांचं रुंदीकरणाची नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करतायत. त्यामुळे दर पावसाळ्यात इथल्या रहिवाश्यांच्या घरात पाणी शिरतं.

कल्याण पूर्व भागातील हनुमाननगरमधल्या टेकडीची दरड कोसळली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात कालपासून मूसळधार पाऊस सुरूये, त्यामुळेच ही दरड कोसळलीये.  सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी टेकडीच्या आजूबाजूच्या बाजुच्या रहिवाश्यांना पालिका प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी हलवलंय.