दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन  गेल्याने लोकलचा  खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 11, 2024, 10:22 AM IST
दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?  title=

Mumbai Local News in Marathi: विकेंडच्या दिवशीच्या तुम्ही जर लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आज (11 फेब्रुवारी) तुम्हाला लोकलचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. कारण शनिवारी एका मोटरमनच्या मृत्यूनंतर लोकलचा खोळंबा झाल्याची बातमी समोर आली होती. त्यातच आज, रविवारी मध्य रेल्वेकडून नियमित मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. परिणामी  बहुतांश मोटरमन अतिरिक्त काम करणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने शनिवारी प्रवाशांचे हाल झाले. त्यातच आजही मेगाब्लॉकमुळे हीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

मध्य रेल्वेवरील मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सिग्नल मोडला होता. मोटरमन शर्मा यांनी सिग्नल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे  त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. याचदरम्यान कारवाई होईल या भीतीपोटी भायखळा येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचे म्हणणे रेल्वे कर्मचारी युनियचे आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) प्रगती एक्स्प्रेससमोर आत्महत्या केली. त्यानंतर शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, कुटुंबातीस सदस्यांना येण्यात उशीर झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यातच रेल्वे मोटार चालकाने आत्महत्या केल्याने इतर कर्मचारी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. परिणामी कामावर असलेल्या कर्माचाऱ्यांची संख्या नेहमी पेक्षा कमी होती. याचा फटका अनेक लोकल गाड्यांवर झाला 147 लोकल रद्द कराव्या लागल्या तर काही लोकल विलंबाने धावत होती. त्यामुळे शनिवारी मुंबईतील अनेक प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

शनिवारी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांना विलंब धावत होत्या. त्यामुळे अनेक लोकल गाड्या 30 ते 40 मिनिटे एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद दरम्यान लोकलची रांग लागली होती. 

आज रेल्वेचा मेगाब्लॉक 

बहुतांश मोटरमननी अतिरिक्त काम करणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने शनिवारी प्रवाशांचे हाल झाले. रविवारीहीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून त्यात मेगाब्लॉकची भर पडणार आहे. 

मध्य रेल्वे

- माटुंगा ते ठाणे अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.14 ते दुपारी 3.09 या वेळेत
- डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल.
-कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

हार्बर रेल्वे

- पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत मेगाब्लॉक 
- पनवेलहून सकाळी 11 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा  बंद राहतील.