फेरीवाल्यांवरुन आता श्रेयवाद, उद्धव आणि राज ठाकरे आमने-सामने

रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा प्रश्न कायम स्वरुपी होता.आज ही कारवाई शिवसेनेच्या दणक्यानंतर झाल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगिल्याने आता श्रेयासाठी चढाओढ दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 7, 2017, 03:17 PM IST
फेरीवाल्यांवरुन आता श्रेयवाद, उद्धव आणि राज ठाकरे आमने-सामने title=

मुंबई : शहर आणि उपनगरातील रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा प्रश्न कायम स्वरुपी होता. दरम्यान, एलफिन्स्टन रोड स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे बळी गेले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढून इशारा दिल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाली. आज ही कारवाई शिवसेनेच्या दणक्यानंतर झाल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगिल्याने आता श्रेयासाठी चढाओढ दिसत आहे.

मनसेचा धसका, या स्थानकांवरील फेरीवाले गायब

एलफिन्स्टन रोड स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन २३ जणांना बळी गेला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेने संताप मोर्चा काढला होता. यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला होता, रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले येत्या १५ दिवसांत हटवा, अन्यथा १६व्या दिवशी आम्ही त्यांना हटवू. २४ तास उलटत नाहीत तोच महामुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत मनसेकडून रेल्वे प्रशासनाला जाग झाल्याचे म्हटलेय. 

राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासन कामाला लागल्याचे दिसत आहे. मनसेच्या कडक इशाऱ्यानंतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले गायब होताना दिसत आहेत. रेल्वेने नोटीस काढून स्थानके फेरीमुक्त करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती मनसेच्या नेत्यांकडून दिली गेली. आता आमच्यामुळे रेल्वेचा परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटलाय, असे उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले. त्यामुळे हा प्रश्न कोणामुळे सुटला याचे आता श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरु झाल्याचे दिसून येत आहे.