बेस्टला आर्थिक सुधारणांचा डोस मिळणार

 सेवा हा मुख्य हेतू म्हणून चालवली जाणारी बेस्ट आता मुख्य हेतूशीच तडजोड करत असल्याचं दिसत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 04:18 PM IST
बेस्टला आर्थिक सुधारणांचा डोस मिळणार title=

मुंबई : बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कृती आराखड्यातील सुधारणांचा डोस मिळणार आहे. मात्र याचा परिणाम म्हणून प्रवाशांनाही त्रास सोसावा लागणार आहे. सेवा हा मुख्य हेतू म्हणून चालवली जाणारी बेस्ट आता मुख्य हेतूशीच तडजोड करत असल्याचं दिसत आहे.

सुधारणांची छडी प्रवाशांच्याच अंगावर

कमी होत असलेली प्रवासी संख्या आणि वाढत जाणारा तोटा, यामुळं बेस्टपुढं दुहेरी संकट उभे ठाकलं आहे. त्यातूनच तोटा कमी करण्यासाठी सुरू झालेली सुधारणांची छडी प्रवाशांच्याच अंगावर वळ उठणारी ठरू पाहतं आहे.  

तिकीट दरात वाढ, विद्यार्थी बसपास दरात वाढ

तिकीट दरात वाढ, दैनंदिन बसपास आणि विद्यार्थी बसपास दरात वाढ, प्रवासी संख्या कमी असलेले मार्ग बंद करणे,  कर्मचा-यांचा प्रोत्साहन आणि प्रवास भत्ता बंद करणे, या महत्वाच्या सुधारणांमुळे बेस्टचा तोटा कमी होणार आहे. तरी याचा थेट परिणाम प्रवाशांवर तर होणार आहेच, शिवाय कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी केल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवरही होणार आहे. त्यामुळंच विरोधकांकडून याला आता विरोध सुरू झाला आहे.

वर्षाला सुमारे ८८० कोटी रूपयांचा तोटा

बेस्टवर सध्या २१०० कोटींचे कर्ज आहे तर वर्षाला सुमारे ८८० कोटी रूपयांचा तोटा आहे. सुधारणांमुळे हा तोटा ५०४ कोटी रूपयांनी कमी होवून ३७६ कोटींवर येणाराय. त्यातच सुप्रीम कोर्टात टीडीएलआरची केस बेस्टविरोधात गेल्यास ३२०० कोटी रूपये वीज ग्राहकांना परत द्यावे लागणार आहेत. 

बेस्टवर सध्या २१०० कोटींचे कर्ज

बेस्टची आर्थिक स्थिती पाहता सुधारणा गरजेच्या होत्याच, पण त्यामुळं प्रवाशांच्या सेवेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याची ग्वाही बेस्टचे अध्यक्ष देतायत.

८० टक्क्यांहून अधिक सुधारणा मंजूर

बेस्टला आर्थिकदृष्टया रूळावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणांसाठी राजकीय दबाव स्वीकारून मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता मात्र ठाम राहिले. यामुळंच कृती आराखड्यातील ८० टक्क्यांहून अधिक सुधारणा मंजूर झाल्यात. आता वेळ आहे प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी आयुक्तांनी पुढं येवून बेस्टला मदत करण्याची.

प्रवाशी टिकवून ठेवण्याचे मोठं आव्हान

सुधारणा आणि महापालिकेच्या मदतीने बेस्ट सध्याची वेळ भलेही मारून नेईल, परंतु भविष्यात मुंबईतील सर्व मेटृो लाईन सूरू झाल्यानंतर प्रवाशी टिकवून ठेवण्याचे मोठं आव्हान बेस्टपुढं राहणाराय. ज्याचा विचार आतापासूनच होणं आवश्यक आहे.