विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

राजीव कासले | Updated: Aug 1, 2024, 09:51 PM IST
विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला? title=

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) कंबर कसलीय. मविआमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 100-100-80 असा फॉर्म्यूला ठरल्याचं कळतंय. त्या आधारे पुढील चर्चा होणार आहे. 

मविआचं ठरलं? 
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 100 जागा लढणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाटी 80 जागा सोडल्या जाणार? इतर छोट्या घटक पक्षांना 8 ते 12 जागा देण्यावर सहमती झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे  ज्याच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री? असंही ठरलंय. मविआत वाद टाळण्यासाठी शरद पवारांचा हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

महाविकास आघाडीची रणनिती
विधानसभा निवडणुकीसाठीची 15 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतदेखील पावसाची शक्यता आहे. प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे मविआचा कल आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर यापुढील काळात बैठका सुरु होणार आहेत. मात्र या बैठका सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांनी मविआसमोर जागा वाटपाचे सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतं.

शरद पवार यांच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने समसमान जागा लढवाव्यात ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्न निकाली निघेल. हा यामागचा उद्देश आहे. 2019 साली शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि युती तुटली. हा पूर्वानुभव लक्षात घेता मविआनं आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलेलं दिसंतय. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून वाद होऊ नयेत, याची खास खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय..