'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

राजीव कासले | Updated: Sep 9, 2024, 03:21 PM IST
'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....' title=

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी आज लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं, यावेळी त्यांच्यासोबत मुख्ममंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अमित शाह यांनी वर्षा आणि सांगर बंगल्यावर जाऊन गणपतीबाप्पाचं दर्शन घेतलं. त्याआधी अमित शाह यांनी रविवारी रात्री एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मोठा वादा केला.

बॉम्बेचं मुंबई करण्यासाठीचा आग्रह

मुंबईतील कार्यक्रमात बोलतांना अमित शाहांनी मोठा दावा केलाय. बॉम्बेचं मुंबई (Mumabi) करण्यासाठी जे आंदोलन झाली त्या आंदोलनात आपला सहभाग होता, असं विधान अमित शाहांनी केलंय. बॉम्बेचं मुंबई करण्यासाठीचा आग्रह आपण धरल्याचंही अमित शाहांनी म्हटलंय. 'घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यांमध्ये मी देखील होतो, मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नाव हवं, अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामध्ये मी देखील होतो. असंह अमित शाह म्हणाले

संजय राऊत यांची टीका

अमित शाह यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केलीय. शाहांनी आंदोलन कलं होतं तर आम्ही काय गोट्या खेळल्या का?... मुंबईसाठी 105 लोकांनी बलिदानही दिल्याचं राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे यासाठी सर्व स्तरावर आंदोलनं केली. आमच्या काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला. आात तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचा मुंबई केलं हे तुम्ही सांगता लोक काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्षाची लोक टाळ्या वाजवतात मुर्खासारखे अशी टीकाही संजयर राऊत यांनी केलीय.  जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय.

कसं पडलं बॉम्बे नाव?

पोर्तुगिजांनी या अनेक नावांनी हाक मारली. त्यावेळी बॉम्बे हे नाव लिखित स्वरूपात घेण्यात आलं.  बॉम्बे हे नाव पोर्तुगिज भाषेतील नावावरून पडले आहे. ज्याचा अर्थ चांगली खाडी असा होतो.  पण मराठी लोक याला मुंबई किंवा मंबईच म्हणायचे. तसंच हिंदी भाषिक लोक या शहराला बम्बई म्हणत. 1995 मध्ये बॉम्बे या शहराचं नाव बदलून अधिकृतरित्या मुंबई असं पडलं. मुंबई हे नाव मुंबा देवीला समर्पित आहे. या देवीच्या नावावरून मुंबई शहराचे नाव पडले आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अनेक वर्षांनी देशातील राज्याच्या सीमा त्या त्या ठिकाणच्या भाषेच्या आधारावर निश्चित केल्या गेल्या. महाराष्ट्र राज्याच्या सीमा निश्चित करतांना येथे भाषेचा प्रश्न निर्माण झाला. कारण या राज्यात  मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जात होत्या. त्यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई हे राज्य महाराष्ट्रात देण्यास नकार दिला. यामुळे मराठी नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात मुंबई समाविष्ट करण्यासाठी मोठा लढा लढला गेला. त्यामुळेच  मराठी माणसांच्या मनात प्रचंड रोष होता. राज्य पुनर्रचना आयोगाचा निषेध नोंदविण्यासाठी छोट्या छोट्या सभा आणि आंदोलनांमधून नागरिक एकत्र आले.

फ्लोरा फाउंटनकडे येत असलेल्या असंख्य नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. 21 नोव्हेंबर 1956 रोजी झालेल्या गोळीबारात  अनेक आंदोलकांचा जीव गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.