राज्यपालांकडून शिवसेनेला मिळू शकतं सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

'जनादेशाचा अनादर असूनही शिवसेनेनं अनिच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यात येणार नाही'

Updated: Nov 10, 2019, 06:35 PM IST
राज्यपालांकडून शिवसेनेला मिळू शकतं सत्तास्थापनेसाठी आमंत्रण  title=

मुंबई : राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर २४ तासांच्या आतच भाजपानं आपल्याकडे पुरेसं बहुमत नसल्याचं सांगत सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवलीय. याचं कारण सांगताना शिवसेनेवर खापर फोडण्याची संधी भाजपानं दवडलेली नाही. परंतु, भाजपानं सत्तास्थापनेचं निमंत्रण करल्यानं राज्यपालांसमोर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला आमंत्रण देण्याचा पर्याय आहे. यामुळे, राज्यात ५६ जागांवर विजय मिळवलेल्या शिवसेनेला इतर पक्षांना सोबत घेऊन सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. दुसरीकडे, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही शिवसेनेला बाहेरून का होईना पण पाठिंबा देण्याचा विचार पक्षांध्यक्षांसमोर व्यक्त केलाय. त्यामुळे, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्तास्थापना करू शकेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

'भाजपा सत्तास्थापनेसाठी दावा करणार नाही'

महाराष्ट्र भाजपाच्या कोर कमिटीनं रविवारी दोन मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर आपला निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कळवला. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भाजपाची दुसरी बैठक पार पडल्यानंतर भाजपाचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले. राज्यपालांची भेट घेणाऱ्या भाजपाच्या कोर कमिटीच्या नेत्यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे, आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस मात्र यावेळी राज्यपालांची भेट घेण्यासाठी उपस्थित नव्हते.

'विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस जनादेश दिला. म्हणूनच पहिल्या क्रमांकावरचा पक्ष ठरल्यानं भाजपाला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी शनिवारी आमंत्रण दिलं. परंतु, जनादेशाचा अनादर असूनही शिवसेनेनं अनिच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यात येणार नाही' असं म्हणत चंद्रकांत दादा पाटील यांनी 'शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा' दिल्या आहेत.