रेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल - अनिल परब

सध्या रेल्वेत फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.

Updated: Sep 21, 2020, 06:28 PM IST
रेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल - अनिल परब title=

दीपक भातुसे, मुंबई : मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्याची एकीकडे मागणी होत असताना दुसरीकडे मात्र अनिल परब यांनी अजून तरी सर्वांसाठी रेल्वे लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले आहेत. सध्या रेल्वेत फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं की, सर्व गोष्टींची काळजी करून रेल्वे खुली करावी लागते. आधीच प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे रेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल. टप्प्याने आम्ही खुली करतो आहे. आता रेल्वेच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या.'

अनिल परब यांनी पुढे म्हटलं की, एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी प्रवासी अजूनही प्रवास करायला धजावत नाहीत. दोन महिने उत्पन्न नसले तरी आपण राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये घेऊन पगार दिले होते. आताही आम्ही राज्य सरकारकडे पैसे मागितले आहेत. राज्य सरकारकडे २२०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यात इंधन, पगार, सुटे भाग यासाठी पैसे मागितले आहेत. यातील ५५० कोटी मिळाले आहेत, उर्वरित लवकर मिळतील. कोविडचा भत्ता द्यायचा शिल्लक आहे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत देणे बाकी आहे ते लवकर आम्ही देऊ.'