मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद

मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या आणि झाडं पडल्याच्या घटना घडल्या.

Updated: Aug 5, 2020, 06:34 PM IST
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद title=

मुंबई : मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या आणि झाडं पडल्याच्या घटना घडल्या. या पावसाचा परिणाम गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या एसटी बसवरही झाला आहे. गणेशोत्सवाकरता कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांनी जय्यत तयारी केली होती. गणपतीनिमित्त मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाण्यासाठी २३ बस आज सोडण्यात येणार होत्या, 

मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे  ठिकठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन ठाणे विभागातून दोन अशा चार बसेस आज मार्गस्थ करण्याचे नियोजन होते .तथापि, मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे -माणगाव आदी ठिकाणी पाणी आल्याने सदरची वाहतूक आजच्यासाठी बंद करण्यात आले आहे. 

उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल रात्रीपासून व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरूवात झाली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या संकटात गणपतीसाठी कोकणात कसं जायचं? याची चिंता चाकरमान्यांना सतावत होती. दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं. 

कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम 

- जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे.

- त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे. 

-  १२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल.