विद्यार्थ्यांनो परीक्षेत उत्तीर्ण व्हा, नाहीतर आहात त्याच वर्गात बसा; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 8, 2023, 10:31 AM IST
विद्यार्थ्यांनो परीक्षेत उत्तीर्ण व्हा, नाहीतर आहात त्याच वर्गात बसा; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय title=

Maharashtra News : शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने  पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणीच नापास होणार नाही ही संकल्पना बाद करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही. तसेच मुलाना शाळेतून काढता येणार नाही असा निर्णय सरकारकडून 2010 मध्ये घेण्यात आला होता. मात्र आता पाचवी ते आठवी या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही.

पाचवी ते आठवी या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही. नापास झालेल्या विद्यार्थ्याची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यास हा करावाच लागणार आहे. नापास झाल्यास पुढच्या कक्षेत जाण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यावीच लागणार आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यानंतर त्याचे मार्गदर्शन करून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र, तरीही विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात बसवले जाईल. हा बदल 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. दोन्ही इयत्तांसाठी प्रत्येक विषयासाठी 50 ते 60 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. यामध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

पाचवी किंवा आठवीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास होत असल्यास त्याला सवलतीचे गुण दिले जातील. मात्र, तरीही तो एक किवा एकाहून अधिक विषयांत नापास झाल्यास त्याची जूनमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केले जाईल. ही परीक्षा सुद्धा मूळ परीक्षेनुसारच असेल, विदर्भ वगळता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीत प्रवेश द्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना पाचवीची परीक्षा पास व्हावीच लागेल. विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत किमान 35 टक्के गुण मिळवण्यासाठी आवश्यक असतील.

वार्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण

वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना गरजेनुसार, सवलतीचे कमाल 10 गुण देणार आहेत. एका विषयासाठी कमाल 5 गुण दिले जाणार आहेत. पाचवी आणि आठवीसाठी 10 गुणांची तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा आणि 50 आणि 60 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. पाचवीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांचा समावेश राहील. तर आठवीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच परीक्षेला गैरहजर राहिल्यासही विद्यार्थी नापासच ठरवण्यात येणार आहे. मात्र त्याला फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.