मेगाभरती चूकच... चंद्रकांत पाटीलांच थेट देवेंद्र फडणवीसांच्या धोरणांवरच बोट

भाजपा सत्तेपासून दूर राहिल्यानं आता ही नाराजी समोर येत आहे

Updated: Jan 18, 2020, 10:40 AM IST
मेगाभरती चूकच... चंद्रकांत पाटीलांच थेट देवेंद्र फडणवीसांच्या धोरणांवरच बोट  title=

मुंबई : मेगाभरती ही चूकच, असं धक्कादायक विधान करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजप मेळाव्यात केलं. या विधानानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवरच बोट ठेवल्याचं बोललं जातं आहे.  मेगाभरती ही भाजपची सर्वात मोठी चूक असून यामुळे भाजपच्या मुळ संस्कृतीला धक्का बसल्याचं चंद्रकांत पाटील या मेळाव्यात बोलले.

काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षात प्रवेश दिला. यावेळी या बाहेरील नेत्यांचं स्वागत करताना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष आता संपणारच असे चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं आणि दुसरं म्हणजे आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील हे दिग्गज नेते आल्याने पक्ष जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास या नेत्यांना होता. मात्र त्याचवेळी या मेगाभरतीमुळे पक्षातील काही जण नाराज होते. ज्यांची संधी या मेगाभरतीमुळे हिरावली गेली किंवा ज्यांना ही मेगाभरती पटत नव्हती ते नेते नाराजी व्यक्त करत होते. मात्र उघडपणे कुणीही बोलायला तयार नव्हतं.

भाजपा सत्तेपासून दूर राहिल्यानं आता ही नाराजी समोर येत आहे असं म्हणावं लागेल. मेगाभरतीचे सर्व निर्णय तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. आता मात्र मेगाभरती चूकच होती असं सांगून चंद्रकांत पाटील यांनी तेव्हाच्या फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्हं लावलं असल्याचं बोललं जात आहे. 

मेगाभरतीद्वारे भाजपामध्ये आलेले चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याने निश्चितच नाराज होणार आहेत. मात्र त्यांची नाराजी वाढून पक्षाची डोकेदुखी आणखी वाढू नये याची काळजी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.  चंद्रकांत पाटील काय बोलले याची माहिती नसल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मात्र मेगाभरती राजकीय पक्ष वाढीसाठी आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. मात्र ती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. नवी भरती भाजपच्या देशभक्ती धोरणाला-समाजहित नीतीला धरून असली तर पक्षाला बळकटी मिळते, पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये, असे ही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. 

चंद्रकात पाटील यांच्या कबुलीमुळे भाजपा विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांनी आता भाजपाविरोधात आघाडी उघडली आहे. चूक लक्षात आली आहे तर मेगाभरती केलेल्या सगळ्यांची हकालपट्टी करा असा थेट टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. कारण मेगाभरतीत सगळ्यात जास्त राष्ट्रवादी पक्ष फुटला होता. 

भाजपा पुन्हा सत्तेत आला असता तर मात्र याबाबत कुणीही काहीही बोललं नसतं. कारण विजयाच्या आड सगळं झाकलंं जातं. मात्र पराभवानंतर आत्मपरीक्षण करताना चुका समोर येतात. तशी मेगाभरतीची चूक आता पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना तिकीट नाकारून आधीच त्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. आताा फडणवीस यांच्या धोरणावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केल्यानं शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपत सारं काही अलबेल नाही हेच स्पष्ट होतंय. खरं तर या मेगाभरतीवेळीही ही नाराजी होतीच, पण आता ती उघडपणे बोलून दाखवली जातेय. यातून भाजपची डोकेदुखी आणखी वाढणार हे निश्चित...