मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं

आता तरी रेल्वे उपाययोजना करणार का ?

Updated: Jul 11, 2018, 01:32 PM IST
मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं आहे. रेल्वे प्रशासनानं पुरेशा उपाययोजना न केल्यामुळेच रेल्वे रुळांवर पाणी साचत असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला आहे. गेल्या कित्तेक वर्षांपासून रेल्वे रुळांमध्ये पाणी साचत आहे. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेनं कोणतीही उपाययोजना केलेली नाहीत. रुळावर पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासन रुळांची उंची का वाढवत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आगे. त्यामुळे आतातरी रेल्वे प्रशासन रुळांबाबत उपाययोजना करणार का याकडे लक्ष आहे.

तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर आज वसईहून विरारच्या दिशेनं पहिली गाडी रवाना झाली आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी चर्चगेटहून वसई रोड स्थानकात आलेली गाडी विरारच्या दिशेनं सोडण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितंल आहे. सकाळच्या सत्रात विरारहून चर्चगेटच्या दिशेनं पाच लोकल गाड्या रवाना झाल्या होत्या. या गाड्या विरार ते नालासोपारा प्रवासात ताशी १० किमी वेगानं धावल्या. त्यामुळे आता तीन ट्रॅकवरची वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, बोरीवली ते चर्चगेट वाहतूकही २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. 

पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपार पर्यंत पाऊस नसेल तर पूर्वरत होईल. एक्सप्रेसची वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं आहे. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने वसई विरारची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आता मात्र वाहतूक धीम्यागतीने सुरू करण्यात आली आहे.