भाजपाच्या चिन्हावर लढण्यास मित्रपक्ष नाराज, 'महायुती'वर प्रश्नचिन्ह

महादेव जानकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं महायुतीत नवा तिढा निर्माण होणार?

Updated: Oct 6, 2019, 07:18 PM IST
भाजपाच्या चिन्हावर लढण्यास मित्रपक्ष नाराज, 'महायुती'वर प्रश्नचिन्ह title=

मुंबई : मित्रपक्षांच्या उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर लढायला लावल्यामुळे, आता मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. रासपाचे महादेव जानकर यांनी याबाबत विचार करण्यासाठी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

महायुतीच्या जागावाटपात भाजपाला १५२ जागा, शिवसेनेला १२४ जागा तर मित्रपक्षांना १२ जागा सोडण्यात आल्यात. मात्र, हे १२ ही उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत.

मित्रपक्षांना सोडण्यात आलेल्या जागा भाजपाच्या चिन्हावर... 

सदाभाऊ खोत, रयत क्रांती सघटना  - पंढरपूर, अक्कलकोट, फलटण

रामदास आठवले, रिपाईं – पाथरी, नायगाव, भंडारा, माळशिरस, मानखुर्द-शिवाजीनगर

महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष – दौंड, गंगाखेड

विनायक मेटे, शिवसंग्राम – वर्सौवा, किनवट

या बाराही जागांवर भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्यानं आता महादेव जानकर संतापले आहेत. तर दुसरीकडे सध्या राज्यात भाजपाची लाट असल्यानं भाजपाच्या चिन्हावर लढणं अयोग्य नसल्याचं रामदास आठवले यांचं म्हणणं आहे.

अर्ज मागे घेण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे, अशा स्थितीत महादेव जानकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं महायुतीत नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे जानकर जरी नाराज असले तरी प्रत्यक्ष निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना काय वाटतं तेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.