'राज्य सरकार हनुमान भक्तांना, तर केंद्र सरकार दाऊदच्या हस्तकांना पकडतंय' - आशिष शेलार

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र दोन्ही पक्षांमध्ये काही नवीन राहिलेले नाहीत. 

Updated: May 10, 2022, 03:04 PM IST
'राज्य सरकार हनुमान भक्तांना, तर केंद्र सरकार दाऊदच्या हस्तकांना पकडतंय' - आशिष शेलार title=

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र दोन्ही पक्षांमध्ये काही नवीन राहिलेले नाहीत. विशेषत: शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद जास्तच पेटून उठताना नेहमी दिसतोय.माजी शिक्षणमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली.ओबीसी आरक्षणाविना निवडणूक लढविण्याचे पाप ठाकरे सरकार करत आहे, तसेचं पातळी नसतांना राज्य सरकार सगळे प्रश्न केंद्रावर करतात, पण आधी ठाकरे सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे आणि नंतर केंद्रावर बोट ठेवावे, अशा रोख शब्दात त्यांनी समाचार घेतला.

आशिष शेलार यांनी आवर्जुन एनआयएचे कौतुक करतांना म्हटले की, केंद्राचे पोलीस हे दाऊदच्या हस्तकांना पकडत आहे. त्याउलट राज्यसरकारच्या दबावाखाली राज्याचे पोलीस मात्र हनुमान भक्तांना पकडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात आडनावावरून कारवाया सुरु आहेत. बेकायदा काम म्हटलं की, ठाकरे सरकारला फक्त राणेचं दिसतात.

खान, शेख, पठाण यांनी बेकायदा बांधकाम केले नाही का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. कारागृह आणि लिलावती रुग्णालयात योग्य वागणूक मिळाली नाही, असा आरोप नवनीत राणांनी ठाकरे सरकारवर केला होता. त्यावर बोलतांना शेलार म्हणाले की, या सरकारची दशा आणि दिशा पूर्णपणे चुकलीय, लिलावती रुग्णालयात ज्यांनी कायदा मोडला असेल, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल, यात दुमत नाही.

आमचा आक्षेप फक्त सरकारच्या राऊडीगिरीवर आहे. आमचा कोणत्याही धर्माला वैयक्तिक विरोध नाही, पण  शाहीन बागेत जसा बुलडोझर चालला, मुंबईत भेंडी बाजार, बेहरामपाड्यात तसा बुलडोझर चालवा, असा सूचक सल्लाही यावेळी त्यांनी दिला.