पाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा

नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Jul 8, 2023, 07:48 PM IST
पाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा  title=

Nagpur Student Death : पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही? मात्र पाणीपुरी खाणं जीवावरही बेतू शकते. पाणीपुरीमुळं एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली नागपुरात दूषीत पाणीपुरी (Panipuri) खाल्ल्यानं एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. पाणीपुरी खाल्यानं नागपुरात तीन तरुणींना गॅस्ट्रोची (Gastroenteritis) लागण झाली होती. यातील एका तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. 

मृत मुलगी मुळची जम्मू-काश्मीरची असून ती शिक्षणासाठी नागपूरला आली होती. गॅस्ट्रो झाल्यानंतरही त्यांनी उपचारास दिरंगाई केल्यानं तिघींचीही प्रकृती बिघडली. यात एकीचा मृत्यू झाला असून दोघींची प्रकृती चिंताजनक आहे.  दोन विद्यार्थीनींवर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. दोन्ही मुली शुद्धीवर आल्यांतर त्यांनी कोणत्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली होती हे स्पष्ट होणार आहे. 

दूषित पाणीपुरी खाल्ली आणि प्रकृती बिघडली

शीतल कुमार असे मृत मुलीचे नाव आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ती बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ती आणि तिच्या दोन मैत्रिणी मेडिकल चौकात एका बंडीवर पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी तिथली दूषित पाणीपुरी खाल्ली आणि त्यांची प्रकृती बिघडली. 5 जुलैला शीतलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेव्हा तिची प्रकृती खुपच बिघडली होती. दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं तिघींनाही गॅस्ट्रोची बाधा झाली. डॉक्टरांची शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर शीतलचा जीव ते वाचवू शकले नाहीत.

मैत्रिणीच्या मृत्यूमुळं त्या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसलाय

शीतलच्या दोन मैत्रिणींना गॅस्ट्रो झाला, मात्र त्या सुदैवानं बचावल्या आहेत. मैत्रिणीच्या मृत्यूमुळं त्या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळं यापुढं तुम्ही पाणीपुरीची चव चाखण्यासाठी जाल तेव्हा ठेल्याच्या आजुबाजूला स्वच्छता आहे की नाही, हे डोळे उघडून पाहा. पावसाळ्यात तर पाणीपुरी किंवा रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणं नक्की टाळा. नाहीतर जिभेचे चोचले पुरवता पुरवता जीव गमावून बसाल.

पाणीपुरी खाल्याने 57 जणांना विषबाधा 

पाणीपुरी खाल्याने 57 जणांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात घडली होती. चाभरा गावात एक पाणीपुरी विक्रेता नियमित येतो. त्याच्याकडूनच जवळपास 70 ते 80 ग्रामस्थांनी काल रात्री पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतर काही जणांना उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला होता.