हवामानाचं यंत्र लावताना नियमांचं उल्लंघन

मात्र पुणे कृषी आयुक्तालयाकडून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. 

Updated: Sep 16, 2017, 11:40 PM IST
हवामानाचं यंत्र लावताना नियमांचं उल्लंघन title=

सतिश मोहिते झी मीडिया नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव मंडळात 2015-16 मध्ये कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं.. या शेतक-यांनी हवामानावर आधारित पीक विमा भरुनही त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.. शेतकऱ्यांनी हवामान यंत्राची माहिती घेतली.

हे हवामान यंत्रच चुकीच्या ठिकाणी लावल्याचं शेतक-यांच्या निदर्शनास आलं. या संदर्भात शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारात कृषी अधिक्षकांकडून माहिती मागवली. मात्र पुणे कृषी आयुक्तालयाकडून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. 
 
हवामान विभागाकडून दिशाभूल होत असल्यानं शेतकऱयांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम राहटी गावात पोहोचली. प्रत्यक्ष जाऊन हवामान यंत्राची पहाणी केली. हवामानाची माहिती देणारं यंत्र लावताना काही नियमांचं पालन करावं लागतं.

या यंत्र बसवताना जवळपास मोठं झाड, विद्युत तारा, जलाशय, मोबाईल टॉवर  असू नये,  मात्र इथं हे सर्वच नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. सारी परिस्थीती पाहून झी हेल्पलाईनच्या टीमनं नांदेडच्या कृषी अधिका-यांची भेट घेतली. शेतक-यांची समस्या त्यांना सांगीतली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सराकारने नव्याने नियमाप्रमाणे हवामान यंत्र बसवण्याचे काम दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व ६४ मंडळात  नव्या निकषानुसार हवामान यंत्र बसवण्यात आल्याचे मोटे यांनी सांगितले. राहटीच्या शेतक-यांच्या पीक विम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं.

अनेक तक्रारीनंतर हवामान यंत्र निकषानुसार लवण्याचे काम सरकारने हाती घेतेले. पण तोपर्यंत चुकीच्या पद्दतीने बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रांचा फटका शेतक-यांना बसला. अश्या सर्व शेतक-यांना सरकारने पिकविम्याचा मोबदला द्यायला हवा. आणि यासाठी ही हेलपलाईन सदैव शेतकऱ्यांच्या सोबत राहील.