पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. 

Updated: Mar 19, 2021, 10:02 AM IST
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण title=

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी ही माहिती दिली. गुलाबराव पाटील यांची प्रकृती ठिक असून मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्र्याचा यावेळी आला अनेकांशी संपर्क...

दरम्यान, काल जळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांच्याशी अनेक लोकांचा संपर्क आला आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे पालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय ॲम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षात भाजपची सत्ता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. या सर्व तीस बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसापासून ठेवण्यात आले होते. 

जळगाव महानगरपालिकेवर जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेने मोठा जल्लोष साजरा केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी नगरसेवकांची जबाबदारी घेतली होती. त्यामुळेच सांगली महानगरपालिकेनंतर भाजपला जळगाव महानगरपालिकेत देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

जळगाव नाही तर धुलगाव झाले होते कोणताच विकास नाही म्हणून लोकांसाठी आम्ही सर्व एकत्र आलोय, आणि पहिल्यांदा जळगाव महपालीकेर सेनेची सत्ता आल्यामुळे आनंदच आहे, लोकान्ही सेनाच हवी होती असे गुलाबराव पाटील पलकमंत्री यानी यावेळी सांगितले.