महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या झळा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ग्रामीण भाग कोरडे

धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं घटत असल्यानं चिंता  

Updated: May 7, 2022, 06:19 PM IST
महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या झळा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ग्रामीण भाग कोरडे title=

Water Shortage in Maharashtra : राज्याला उन्हाचे चटके बसत असताना आता काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

औरंगाबादमध्या पाण्यासाठी आंदोलन

औरंगाबादमध्ये पाण्यासाठी सलग दुस-या दिवशी आंदोलन सुरुय. सिडको, हडको भागात अजूनही 8 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात भाजपकडून सिडको पाणीपुरवठा कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येतंय. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पाणी प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा भाजपनं दिलाय. 
दरम्यान राज्याचे पाणीपुरवठा प्रधान सचिव संजय जैस्वाल यांनी औरंगाबादेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात पाणी योजनेचं काम संथगतीनं सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसंच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरात 10 नवे जल कुंभ उभारण्याचे आदेश दिलेत. किमान यानंतर तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळेल अशी आशा व्यक्त होतेय.

नागपूरात पाणी प्रश्न पेटला

नागपुरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. पाण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलंय. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंजारीनगरातील पाण्याच्या टाकीवर चढून OCW विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस OCW च्या विरोधात आक्रमक झाली असून, दक्षिण नागपुरातील नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

दरमयान, पाणी टंचाई लक्षात घेता सरकारही सावध झालं असून जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे वळवण्यात आलेत. कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू देऊ नका, असे आदेश देण्यात आल्याचं अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय.