मराठवाड्यासह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचा मोठा तडाखा

कोरोना पुन्हा फैलावत असतानाच राज्यावर आता परत अवकाळी संकट कोसळले आहे. औरंगाबादसह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचे थैमान सुरुच आहे.  

Updated: Dec 29, 2021, 08:44 AM IST
मराठवाड्यासह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचा मोठा तडाखा title=
संग्रहित छाया

औंरगाबाद : कोरोना पुन्हा फैलावत असतानाच राज्यावर आता परत अवकाळी संकट कोसळले आहे. औरंगाबादसह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचे थैमान सुरुच आहे. पुन्हा पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.  (Untimely rain, hail at Vidarbha and Marathwada)

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस

राज्यातील वातावरण बदलाने चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसधारा कोसळत आहेत. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच थंडी परतली होती. मात्र, लगेच वातावरण बदलून आलेल्या पावसाने गारठ्यात वाढ झाली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कालपासून अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अमरावती शहर आहे की चिखलदारा असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

पुन्हा गारपिटीचा तडाखा

राज्याला पुन्हा गारपिटीनं तडाखा दिला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यतल्या अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिलाय. वैजापूरच्या देवगाव, शनि चेंडूफळ, बाजाठाण, गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा आणि गंगापूरमध्ये गारपीट आणि पाऊस झाला. तर कन्नड आणि पैठणमध्येही तुफान पाऊस झाला. विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातले आहे. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्याला पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढले. वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात तुफान गारपीट झाली. 

संत्रे पिकाला मोठा धोका

गारपिटीने संत्र्याचा बहार हातातून जाण्याची शक्यताय. तूर, हरभरा, कांद्यालाही गारपिटीचा फटका बसण्याची शक्यताय. नागपूर जिल्ह्यातही गारपीट झाली. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. फुलो-यावर असलेल्या तूर आणि हरभ-याचं पावसानं नुकसान होणारय. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

कन्नड आणि पैठणमध्येही तुफान पाऊस

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिलाय. 20 मिनिटं पडलेल्या या पावसानं शेतक-यांचं प्रचंड नुकसान केलंय. वैजापूरच्या देवगाव, शनि चेंडूफळ, बाजाठाण, गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा आणि गंगापूर तालुक्यामध्ये गारपीट आणि पाऊस झाला. कन्नड आणि पैठणमध्येही तुफान पाऊस बरसला. रब्बी पिकांना या गारपिटीचा फटका बसण्याची शक्यताय. 

गारांचा पाऊस, शेतकऱ्यांवर मोठं संकट

यवतमाळमध्ये गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. बाभूळगाव, कळंब आणि नेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे सर्वत्र गारांचा खच पडला...गारपीट इतकी जोरदार होती, की झाडांना आणि पिकांना पानेही उरली नाहीत...पाऊस ओसरल्यानंतर चक्क फावडे घेऊन गारा बाजूला ओढाव्या लागल्या आणि रस्ते, घराचे आंगण मोकळे करावं लागले...या गारपीठीमुळे तूर, हरभरा आणि गहूसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वर्ध्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. हलक्या गारांसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट तालुक्यात गारांसह पाऊस पडल्याने चणा, तूर आणि कपाशी पिकाचं नुकसान झालं. आर्वी तालुक्यातील काही गावात तूर सोंगणीचे काम सुरु असल्याने सोंगून ठेवलेल्या तूर पिकाचे नुकसान झालं असून शेतातील कापूस देखील ओला झालाय. तर बुलढाण्यात पावसासह गारपीटही झालीय. धुक्याच्या चादरीनं रब्बी पिकांना धोका निर्माण झालाय.सध्या बुलढाणाच्या आजूबाजूला दाट धुक्याची चादर पसरली आहे.