उदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’

खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. 

Updated: Jun 22, 2019, 10:58 AM IST
उदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो,  फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’ title=
संग्रहित छाया

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजप सराकवर जोरदार टीका केली. प्रगतशील देशांनी सुद्धा EVM नाकारले आहे मग आपल्या कडे का ? असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी. लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? लहान मुलांच्याकडून चिठ्या काढून आमदार खासदार निवडा, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला लगावला आहे. खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल चढवला. तसेच याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले आहे.

यावेळी ‘मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातली फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’, असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला आणि सरकारला दिले आहे. जे काय व्हायचे आहे ते होऊन जाऊ द्या.  ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी आल्या. यासंदर्भात राज्यातल्या इतर उमेदवारांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. 

उदयनराजे भोसले यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  हा लोकशाहीचा घात आहे, काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या, असे उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे, असे त्यांनी म्हटले आहे

एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान झालाय. दुसरे म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहीत असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहीत असते, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. कारण अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.