पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत

लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. 

Updated: Aug 13, 2020, 01:41 PM IST
पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत  title=
संग्रहित छाया

पुणे : लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे.  या ठिकाणी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशिक्षण मिळणार आहे. १ डिसेंबरपासून हे प्रशिक्षण सुरु होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज येथे दिली.

सध्या कोविड-१९ची परिस्थिती बघता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. उद्या न्यायालयात तारीख असल्याने आज मी त्या विभागाचा प्रमुख असल्याने बोलणे उचित नाही.  जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करतोय. कोविड-१९ची परिस्थिती बघता परीक्षा घेता येणार नाही आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयात दिले आहे.

CET बाबत अभियान सुरु आहे, सीईटीबाबत सात ते आठ दिवसांत निर्णय होईलस असे सांगून उदय सामंत म्हणाले, तालुका स्तरावर सीईटी घेता येईल का, त्याची चाचपणी करण्यात येत आहे. सीईटी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे. आणीबाणीची परीक्षा बघून बारावीसाठी सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहेत. याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

ऑनलाइन फीबाबत विचार सुरु आहे. याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत एक व्यापक बैठक घेत आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहे त्यांच्यासाठी विचार करत आहोत. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्याचा सरकारचा विचार आहे. दरम्यान,  राज्यात या वर्षात सर्वाधिक संस्कृत शाळांना परवानग्या दिल्या आहेत. मराठी आणि संस्कृत या आपल्या भाषा आहेत. राज्य सरकार यात पुढाकार घेत आहे. यात सरकारी शाळा, महाविद्यालये जास्त असतील, असे ते म्हणालेत.

 मागच्या पाच वर्षात कुलगुरुना इतकं कुणी भेटले नसेल, तेवढा मी एकटा भेटलो आहे. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, मी दाखवू शकतो. आरोप प्रत्यारोप झाले असले तरी मी कोविड-१९मुळे काही निर्णय घेतले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बाहेर आणले असते तर भयावह परिस्थिती आली असती, अशी भीती त्यांनी स्पष्टीकरण देताना व्यक्त केली.

दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही यावर भाष्य केले. तीन पक्षात अतिशय समन्वय आहे. आम्ही एकमेकांची कामे करत आहोत. काही लोक स्ततःचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आरोप करत आहेत. ठाकरे सरकारला टार्गेट केलं जात आहे. मात्र महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे, असे सामंत यांनी विरोधकांना उत्तर दिले. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी निवड करणे योग्य आहे. आदित्य ठाकरे यांच्यात कुवत आहे. ज्यांना ठाकरेंची अॅलर्जी आहे त्यांचाच विरोध आहे, असे ते म्हणाले.