युतीच्या घोषणेआधी समसमानच्या मुद्द्यानं धरला जोर

युतीच्या घोषणेआधी समसमानवर जोर

Updated: Sep 23, 2019, 09:01 PM IST
युतीच्या घोषणेआधी समसमानच्या मुद्द्यानं धरला जोर title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी पुन्हा समसमानच्या मुद्द्यानं जोर धरला आहे. समसमान आहे तरी काय? युतीच्या चर्चेत समसमान या शब्दावर एकमत आहे. दोघांमध्ये असं ठरलंय तरी काय ?. जागावाटप समसमान, मंत्रिपदाचं वाटप समसमान आणि मुख्यमंत्रीपद ही समसमान म्हणजेच अडीच अडीच वर्षांसाठी दोघांनी वाटून घेणं. युती होण्यासाठी या संभाव्य समसमान गोष्टींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकारपरिषदेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो युतीचं काय होणार... पण तो मुद्दा एका वाक्यात मुख्यमंत्र्यांनी टोलवला.

युतीची तुमच्याइतकीच चिंता मलाही आहे. असं मुख्य़मंत्र्य़ांनी म्हटलं. आता युतीची चर्चा नेत्यांमध्ये होणार नाही, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होणार आहे. त्यातच अमित शाह २६ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. त्याचवेळी युतीच्या घोषणेला मुहूर्त मिळेल, असा अंदाज आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अखेर सेना भाजपची युती होणार असल्याचं चित्र दिसत आहे. उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यामध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे. अर्थात नेमका कोणता फॉर्म्युला युती करतांनाचा ठरलाय, हे अजून गुलदस्त्यात आहे. 

शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत होते. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास तयार असल्याचं देखील सुत्रांनी म्हटलं होतं. युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना समसमान जागांवर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.