'याला हिंदुत्व मानता येणार नाही, हा हिंदूंचा विश्वासघात'; उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद (Swami Shankaracharya Avimukteshwaranand)यांनी सोमवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं विधान करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून, ते सर्वात मोठं पाप असल्याचं म्हटलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2024, 11:38 AM IST
'याला हिंदुत्व मानता येणार नाही, हा हिंदूंचा विश्वासघात'; उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं title=

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद (Swami Shankaracharya Avimukteshwaranand)यांनी सोमवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं विधान करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून, ते सर्वात मोठं पाप असल्याचं म्हटलं. दरम्यान मातोश्रीवरील या भेटीत नेमकं काय घडलं याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोठसुळ उठला असेल. टीका टिप्पणी केली असेल याचा अर्थ असा आहे त्यांना हिंदुत्व मान्य नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 

"ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद मुंबईत होते आणि त्यांच्या मुंबई दौऱ्यात काल मातोश्रीवर त्यांचं आगमन झालं. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तूत त्यांची येण्याची इच्छा होती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांना भेटायचं होतं. काल ते त्यांच्या सर्व शिष्यांसह मातोश्रीवर आले आणि मातोश्रीवर त्यांचं हिंदू संस्कार, परंपरा, रितीरिवाजानुसार त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यासाठी मातोश्रीवर काल विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू धर्मानुसार शंकराचार्य यांचं स्वागत ज्या धार्मिक शिष्टाचारानुसार करायला हवा त्या प्रकारे स्वागत केलं. त्यांनी माननीय उद्धव ठाकरे सर्व ठाकरे परिवाराला शिवसेनेला आशीर्वाद दिले काही चर्चाही केली," असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

"उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला आहे हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात. याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला असेल. टीका टिपणी केली असेल याचा अर्थ असा आहे त्यांना हिंदुत्व मान्य नाही," असं संजय राऊत म्हणाले. 

"हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरू शंकराचार्य यांची भूमिका मान्य नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत, धर्मगुरू आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत. त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असा मी मानतो. आता तुम्ही शंकराचार्य यांना देखील खोटं ठरवणार असाल तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण संपूर्ण तुमचा डोलारा खोटेपणाचा आहे. याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्य यांचा आशीर्वाद घेतला आहे," अशी आठवण संजय राऊतांनी करुन दिली. 

"घटनाबाह्य सरकारविरोधात न्यायालयात आमचा खटला सुरू आहे. तो चालेल तेव्हा चालेल. पण आदरणीय शंकराचार्य यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्या वरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी आहे. मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही. शंकराचार्य यांनीदेखील राजकीय भाष्य केलेले नाही.  शंकराचार्य यांनी फक्त त्यांचं मन मोकळं केलं कारण शिवसेना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत करत होते आणि आहेत. त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पडला त्याला हिंदुत्व मानता येणार नाही. हा हिंदूंचा विश्वासघात आहे अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या," अशी माहिती संजय राऊतांनी दिली.