'CM शिंदे मौलवीचा वेष धारण करुन...', राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले 'ही हरुन अल रशीदची पोरं'

गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत अशा टीका संजय राऊत यांनी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 31, 2024, 12:09 PM IST
'CM शिंदे मौलवीचा वेष धारण करुन...', राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले 'ही हरुन अल रशीदची पोरं'  title=

Sanjay Raut on Home Ministry: गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही (Ajit Doval) या कटात सहभागी असू शकतात असा आरोपही केला. त्यांना विमानतळावरु सुरक्षित बाहेर पडता यावं यासाठी दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असतील अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली. 

"एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेष धारण करुन दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेषांतरं केल्याचं त्यांचेच लोक सांगत आहेत. भुजबळांनी सीमाभागातील लढ्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते आवडलं होतं. त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता. अशाप्रकारे राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी भूमिका वठवण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत. तो अशी वेषांतरं करत फिरायचा," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही - संजय राऊत

 

"राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना ते काय करत होते? ते जेम्स बाँड आहेत ना? त्यांना मुंबई, दिल्लीतील विमानतळांची सुरक्षा धोक्यात असतानाही कळलं नाही," अशी विचारणाही त्यांनी केला. 

"महाराष्ट्रात नाटकाला, रंगभूमीला प्रतिष्ठा आहे. पण जो प्रकार सध्या सुरु आहे तो देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावं, वेषांतरं, बोर्डिंग पास, ओळखपत्रं तयार करुन मुंबई, दिल्लीसाऱख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन प्रवास करता. याचा अर्थ सीआरपीएफला अमित शाहांनी यांनी सोडा असं कळवलं होतं. याप्रमाणे आधी दाऊद, माल्ल्या, मेहुल चोक्सी, टायगर मेमन यांना सोडलं आहे का हा चिंतेचा विषय आहे. गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय खोट्या नावाचे बोर्डिंग पास मिळूच शकत नाहीत. अनेकदा आम्हाला, मंत्र्यांना थांबवण्यात आलं आहे. खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित बाहेर पडता यावं यासाठी दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असलायच हव्यात," अशी शंका त्यांनी उपस्थित केली.