'फडणवीस सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली'

शरद पवारांची तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका

Updated: Dec 21, 2019, 01:08 PM IST
'फडणवीस सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली' title=
संग्रहित फोटो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषेदत शरद पवारांनी तत्कालीन सरकारवर टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.फडणवीस सरकारने ५ वर्षांचा हिशोबच दिला नाही, ५ वर्षांत राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याचा थेट आरोप शरद पवारांनी केला आहे. कॅगने सादर केलेले अहवाल गंभीर असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला(Citizenship Amendment Act) राष्ट्रवादीनेही विरोध (Anti-CAA) दर्शविला आहे. देशात सध्या वेगळं चित्र आहे, गंभीर विषयांवरील लक्ष हटवण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशाच्या धार्मिक, सामाजिक ऐक्याला धक्का पोहचण्याची शक्यता असल्याचा आरोप शरद पवारांनी केंद्र सरकारवर केला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी योग्य चौकशीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.