...अन् त्याने घेतला स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा

तो आहे स्मशानभूमीतला स्वच्छतादूत

Updated: Dec 28, 2019, 11:17 AM IST
...अन् त्याने घेतला स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा  title=
संग्रहित छायाचित्र

प्रताप नाईक, झी मिडीया, कोल्हापूर : स्मशानभूमी म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा य़ेतो. काहीजण तर या ठिकाणी न जाण्याचे अनेक बहाणेही देतात. याच या स्मशानभूमीत आयुष्याचा अंत लिहिलेला असतो. इथे रोज कुणाचं ना कुणाचं सरण जळत असतं. जिथं माणसाच्या प्रवासाचा शेवट होते त्य़ा स्मशानात कमालीची अस्वच्छता असते. ही बाब हेरत सांगलीतील  इस्लामपूरच्या चंद्रशेखर तांदळे या तरुणाने स्मशानभूमींच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. 

आतापर्यंत त्याने ३३३ स्मशानभूमी स्वच्छ केल्या आहेत. चंद्रशेखरने ५०० स्मशानं स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. या अनोख्या उपक्रमासोबतच तो अंधश्रद्धा निर्मुलनाचंही काम करत असतो. 

स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत गल्ली बोळापासून ते अगदी गटारं आणि चौकांपर्यंत बरीच ठिकाणं स्वच्छ होत आहेत. त्यामुळे स्मशानही स्वच्छ असलं पाहिजे असा विचार त्याने सर्वांपुढे ठेवला. या विचारातून त्याने  माणसाला अखेरचा निरोप देणारं हे ठिकाण म्हणजेच स्मशानभूमीसुद्धा कायम स्वच्छ ठेवण्याचं अभियान हाती घेतलं आहे. 

स्मशानात मृताच्या  अंत्यसंस्कारासाठी आप्तांनी केलेल्या विधींनंतर होणाऱ्या अस्वच्छतेमुळं कुठेतरी या अंत्यविधींचीही कुचंबना होत होती. पण, चंद्रशेखरच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमीही नीटनेटकी दिसू लागली आहे. जे काम प्रशासनानं करणं अपेक्षित होतं तेच काम हा अवलिया करतो हे मात्र सर्वतोपरी कौतुकास्पदच म्हणावं लागेल.

शासनाने आखून दिलेल्या उपक्रमांच्या मार्गावर चालत त्या अनुषंगाने कृती करणारे अनेक आहेत. पण, यामध्ये अनेकदा स्वत:पुरताच विचार केला जातो. असं न होऊ देता काही तरुणमंडळी किंवा काही व्यक्ती हे समाजाप्रती आपली जबाबदारी जाणत अतिशय प्रशंसनीय आणि परिवर्तनीय असे निर्णय घेतात. चंद्रशेखर तांदळे हे नावही त्यापैकीच एक.