राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध शिथील, काय सुरु काय बंद?

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.  

Updated: May 31, 2021, 10:29 PM IST
राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध शिथील, काय सुरु काय बंद? title=

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा जोर ओसरला आहे. सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, लातूर आणि जळगाव या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार उद्यापासून (1 जून) ते 15 जूनपर्यंत हे निर्बंध शिथील केले गेले आहेत. यानुसार अत्यावश्यक आणि इतर दुकांनांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. मात्र, यासह नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Restrictions relaxed in Mumbai Jalgaon Pune and Latur districts know what started and closed)    

लातूरमध्ये काय सुरु? 

कोव्हीड नियमांचे पालन करून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र दुपारी 3 नंतर संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. यातून मॉल्स आणि शॉपिंग सेंटरर्सला वगळण्यात आली आहेत. सर्वच एकल दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. तर शनिवार आणि रविवारी कडक विकेंड राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. 

जळगावमध्ये काय सुरु राहणार?

जळगावमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारचे सर्व दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. अत्यावश्यक वस्तू आणि आणि अन्य सेवा दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत घरपोच देता येतील.

पुणे

पुण्यातही वरील जिल्ह्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकानं सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानं 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहतील. हॉटेल्स, उद्यान नेहमी प्रमाणे बंदच राहणार आहेत. मात्र हॉटेलमधून पार्सल सेवा सुरु राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता सर्वसामन्यांना दुपारी 3 नंतर घराबाहेर पडण्यावर मनाई असणार आहे.  

राज्यात 15 हजार 77 नवे रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे दुर्देवाने 184 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 53 लाख 95 हजार 370 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांचा आकडा हा 2 लाख 53 हजार 367 इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 93.88 इतका झाला आहे.