कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड, तीन जणांना अटक

 सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे.  

Updated: Sep 3, 2020, 08:29 AM IST
कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड, तीन जणांना अटक  title=

नवी मुंबई : सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. कोविड-१९ काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणार रेशनिगचा तांदूळ थेट त्यांना न मिळता १३ दक्षिण आफ्रीकन देशात निर्यात होत असल्याचे पुढे आले आहे.

 हा रेशनिगचा तांदूळ  कर्नाटक, हरियाना,चंदीगड आणि महाराष्ट्र राज्यातून आणण्यात आला होता.  आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने २७० मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. तसेच  गेल्या आठ महिन्यात ३२,८२७ मेट्रीक टन तांदूळ या दक्षिण आफ्रीकन देशात निर्यात केला आहे. याची किंमत ८० कोटी च्या घरात आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपी निष्पन्न झाले असून कर्नाटकमधून  तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे, अशी माहिती  नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे.

सरकार गरीबांसाठी पाठवत असलेला तांदूळ ही टोळी रेशनिंगचा दुकानातून मिळवत असे , कोरोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केली, तसेच कोरोनाकाळात जास्त तांदूळ  देखील वाटण्यासाठी पाठवण्यात आला होता. हा सर्व तांदूळ काळाबाजार करून  महाराष्ट्रातील गोडाऊनमध्ये आणला जात होता आणि नंतर दुसऱ्या गोणीमध्ये भरून तो आफ्रीकन देशात निर्यात केला जात होता.

नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टीकमधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फूड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूरमधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनी मधून तब्बल ९१,१२,०४६ रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला  आहे.