पुण्यातल्या जोडप्याचे चक्क 36 पानांचे लग्नाचे आवतान; आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Pune News : पुण्यातील या आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल होत असून अनेकांनी या पत्रिकेचे जोरदार कौतुक केले आहे. 

Updated: Apr 17, 2023, 05:06 PM IST
पुण्यातल्या जोडप्याचे चक्क 36 पानांचे लग्नाचे आवतान; आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : जसा काळ बदलत चालला आहे तशा लग्नाच्या (marriage) पद्धतीदेखील बदल बदललेल्या पहायला मिळत आहे. त्यात लग्नाच्या पत्रिकांचे (wedding card) स्वरूप देखील बदलले आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाचा करारनामा करत पत्रिका सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली होती. आता जुन्नर (junnar) तालुक्यातून पुन्हा अशीच एक शिवशही विवाह सोहळ्याची लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. ही लग्नाची पत्रिका चक्क 36 पाणांची आहे. या भल्यामोठ्या लग्न पत्रिकेतून लग्नाचे आवताण देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील चंद्रशेखर शिखरे आणि जुन्नर तालुक्यातील बल्लाळ वाडी येथील प्रभाकर मारुती डोंगरे यांच्या मुलांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साधारणता लग्न करताना पत्रिका पाहिल्या जातात त्यात 36 गुण जुळले की नाही हे पाहिले जाते. मात्र इथे तर चक्क 36 पानांची लग्नपत्रिका छापण्यात आली आहे. या लग्नपत्रिकेतून पुरोगामी आणि ऐतिहासिक, सामाजिक विषयांवर भाष्य केल्याचे पहायला मिळत आहे. या पत्रिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नातेवाइकांची नावे न टाकता वधू आणि वराच्या शिक्षणाचा परिचय देण्यात आला आहे. तसेच 35 महापुरुषांचे फोटो देखील आहेत. 

शिखरे कुटुंबाची कन्या एशिता आणि डोंगरे यांचा मुलगा मयूर यांचा शुभ विवाह 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. एशिता आणि मयूर हे दोघेही उच्च शिक्षित असून उच्च पदावर कार्यरत आहे. या पत्रिकेत एशिता आणि मयूरचा फोटो अल्प परिचय देण्यात आला आहे. याच बरोबर शिखरे परिवाराचा ग्रुप फोटो व माहिती देखील देण्यात आली आहे.

यासोबतच आवली व संत तुकाराम, शिव-पार्वती विवाह सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती तसेच जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई संत मुक्ताबाई, अक्का महादेवी यांची माहिती देण्यात आली आहे. कॅप्टन लीलाताई व सेनानी डॉ. उत्तमराव पाटील जिजाऊ व शहाजीराजे, संत सोयराबाई व संत चोखामेळा, सईबाई व छत्रपती शिवराय, महाराणी देवी व सम्राट अशोक, महाराणी चिमणाबाई, सयाजीराव गायकवाड या उभयतांची तसेच ताराबाई शिंदे, डॉ. रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजनी नायडू यांच्या सचित्र माहिती, संत व महात्मे यांचे अभंग दिले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही पत्रिका छापण्यात आली आहे. पुण्यातील जिजाऊ प्रकाशन यांनी ही पत्रिका तयार केली आहे. शिवाय पत्रिकेत नातेवाइकांची कुठलीच नावे नसून ठेवा करून ठेवावा अशी ही पत्रिका सद्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे