जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ही भावना, म्हणाल्या... करून दाखवते...

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी महत्वाचं विधान केलंय.  

Updated: Jun 3, 2022, 03:05 PM IST
जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ही भावना, म्हणाल्या... करून दाखवते... title=

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी यापूर्वी आपण जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये एकच गहजब माजला होता. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांना भाजपमधून योग्य रित्या बाजूला करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

यापूर्वी झालेल्या विधानपरिषद आणि आताच्या राज्यसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अपेक्षाभंग झाला. परंतुं नुकत्याच होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा स्मृती समर्पित कार्यक्रम आहे. बहुजनांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. असा कुठलाही महाराष्ट्रातला नेता नाही जो गोपीनाथराव यांच्यासाठी इथे आला नाही. लोकांना नवीन नवीन नेते गडावर यावेत असं वाटतं असतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी जी भूमिका घेतली आहे. त्याचे स्वागत करते. जातीय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी आरक्षणासंदर्भात काही मदत लागली तर सरकारने मध्यप्रदेश सरकारची मदत घ्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.

कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी ऊसतोड महामंडळाची भूमिका पाहिजे. राजकारणात अनेकदा संधी येत-जात असतात. मी कुठल्याही संधीसाठी प्रयत्न करत नाही. अपेक्षा करत नाही. माझा तसा स्वभावही नाही. जी संधी मिळेल त्याचे मी सोने करून दाखवते, असे सांगत त्यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीचे संकेत दिले.

मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे आणि लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, ते पाहावं लागेल. घोडामैदान फार लांब नाही, असेही त्या म्हणाल्या.