नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा

नवी मुंबई  शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: May 20, 2020, 01:22 PM IST
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा title=

नवी मुंबई : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक मार्केटमुळे (वाशी एपीएमसी मार्केट) मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला असल्यांचे आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने दोन वेळा एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते.

एपीएमसी मार्केट पुन्हा १८ मे रोजी सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाने एक आठवडा मार्केट बंद करुन आता सुरु केले आहे. मुंबई आणि उपनगरात भाजीपाला, फळ , अन्नधान्य थेट घेवून जाणे गरजेचे आहे. मात्र बाजार समितीने नियम पाळले नाही आणि पुन्हा कोरोनाचा आकडा वाढला तर मात्र मार्केट बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन, अशा इशारा  भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.

आमदार गणेश नाईक यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या धान्य आणि मसाला मार्केट,नवी मुंबई मनपाच्यावतीने सिडको एक्झिबेशनमध्ये उभारण्यात येणाऱ्या ११५० बेडच्या हाॅस्पिटलला आणि राज्यातून जाणाऱ्या परप्रांतीयांची भेट घेत सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत  महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, सुधाकर सोनवणे, सभापती  नविन गवते, नगरसेविका सौ नेत्रा शिर्के,डाॅ.जयाजी नाथ, दशरथ भगत, सुरज पाटील आदी उपस्थित होते. 

सोशल डिस्टन्सिंग पाळत मोर्चा काढण्यात येईल असे आमदार गणेश नाईक यांनी म्हटले आहे. एपीएमसी मार्केटमुळे नवी मुंबईतील लोकांचे जीव धोक्यात घालू नका, अशी मागणी गणेश नाईकांनी केली आहे. नुकतीच गणेश नाईक यांनी मार्केटला भेट देत नियमांचे पालन केलं जात आहे का, याचा आढावा  घेतला.