पहिल्या पावसानं छप्पर हिरावलं, सोन्यासारखे बैलही गेले आणि....

पहिल्या पावसानं उडवली दाणादाण, कुठे घरांची छपरं उडाली तर कुठे जीवितहानी झाली... पाहा पहिल्या पावसानंतर राज्यातील स्थिती   

Updated: Jun 12, 2022, 09:12 AM IST
पहिल्या पावसानं छप्पर हिरावलं, सोन्यासारखे बैलही गेले आणि.... title=

नाशिक : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.. वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत. तर शिरिशपाडा इथं विज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला..या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीये. 

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसानं नुसती दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे मोबाईल मार्केट मधील अनेक दुकानांचे पत्रे उडाले, अनेक दुकानांची होर्डिंग्ज तुटली... त्यामुळे अनेक दुकानदारांचे प्रचंड नुकसान झालंय. शहरातल्या अवैध बॅनर्सचा मुद्दाही पुन्हा उपस्थित झालाय. 

मराठवाडामध्ये शनिवारी अनेक भागात पाऊस झाला या पावसात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.. यात औरंगाबाद जिल्ह्यात 2 तर जालना जिल्ह्यातील 3 जणांचा समावेश आहे.. तर 3 जण जखमी झाले आहेत. मात्र गेली 2 दिवस चांगला पाऊस झाल्याने दुसरीकडे बळीराजा मात्र सुखावला आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या हा एव्हढा भयंकर होता की अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहने थांबून होती तर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

 अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पावसानं माठं नुकसान केलयं. शहरात जोरदार वा-यासह आलेल्या पावसामुळे  सराफ बाजार येथील एका जुन्या इमारतीची गॅलरी कोसळलीये. तर दुस-या घटनेत जोरदार पावसानं ठिकठिकानी झाडं उन्मळुन पडली. यात एक चारचाकी गाडीचंही नुकसान झालाय.. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पावसाच्या तडाख्यामुळं अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात केळी पिकाचं अतोनात नुकसान झालं. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला. वादळी वा-यासह पाऊस झाल्यामुळं केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत.जवळपास 100 ते 120 हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

मुंबईत मान्सूनचं आगमन झालंय. मुंबई आणि उपनगरात दमदार हजेरी लावल्यानंतर आज डहाणूमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं. मुंबईसह उपनगरांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला. कोकणात पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर  लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.