मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार

Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा वार करुन खून केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 27, 2023, 12:47 PM IST
मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik Crime) गुन्हेगारीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे. क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून मित्रानेच तरुणाचा खून केल्याची घटना नाशिक शहरात घडलीय. महत्त्वाची बाब म्हणजे हल्ला करणाऱ्या मित्राने जखमी मित्राचा अपघात झाला असल्याचा बनाव रचून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी (Nashik Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मयत तरुणाचे नाव विश्वनाथ सोनवणे पाटील आहे. समशेर शेख आणि दीपक सोनवणे यांनी चौकशीत विश्वनाथवर दारूच्या नशेत हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री सातपूर येथील कार्बन नाका येथील महादेव मंदिराजवळ समशेर शेख आणि दीपक सोनवणे आणि मयत विश्वनाथ सोनवणे पाटील हे दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी तिघांमध्ये काही वाद झाले. यानंतर समशेर शेख याने जवळच असलेल्या गुप्तीने विश्वनाथ याच्यावर हल्ला केला यानंतर समशेर आणि दीपक यांनी त्याला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

आरोपींना अटक कशी झाली?

शनिवारी रात्री विश्वनाथवर सपासप वार करुन त्याला संपवण्याचा प्रयत्न दोन्ही आरोपींनी केला. त्यानंतर आरोपींनी हत्येला अपघात दाखवण्यासाठी बनाव रचला आणि विश्वनाथला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयातील पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना दोघांवरही संशय आला. त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी गंगापूर पोलिसांना याची माहिती दिली आणि दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला.

दरम्यान, नाशिक शहरात गेल्या पंधरा दिवसातील हा पाचवा खून आहे. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक या सर्वांच्या बदल्या करूनही नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे पोलीस आयुक्तांचा नाशिक शहरातील गुंडांवर अंकुश  राहिला नसल्याचे समोर येत आहे.

जेवणाच्या बिलावर लावलेल्या सर्व्हिस टॅक्सवरुन ग्राहकाला मारहाण

पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल स्पाइस फॅक्टरीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुजेफा अतरवाला हे आपल्या मैत्रिणीसह एन आय बी एम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेवणाच्या बिलावर आलेल्या सर्व्हिस टॅक्सबाबत हॉटेल मॅनेजरला विचारणा केली. या गोष्टीचा राग मनात ठेऊन हॉटेल मॅनेजरने पाच ते सहा वेटरला हाताशी घेऊन अतरवाला यांना काचेच्या बॉटलने तसेच काचेच्या बरणीने मारहाण केली. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर सह इतर वेटर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.