मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर कधीपर्यंत भरावा लागणार टोल? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Toll News: मुंबईकरांना 2027 पर्यंत टोल भरावाच लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 10, 2023, 01:45 PM IST
मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर कधीपर्यंत भरावा लागणार टोल?  जाणून घ्या सविस्तर title=
MSRDC has toll collection powers till September 30 2027

Mumbai Toll News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छोट्या गाड्यांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनसेने टोलविरोधात पुन्हा आंदोलन छेडल्याने मुंबईकरांना टोल रद्द होण्याची आशा असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर 2027 पर्यंत मुंबईकरांना शहराच्या वेशीवरील पाचही टोल भरावे लागणार आहेत.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. (Mumbai News Today)

मुंबईकरांना सप्टेंबर 2027 पर्यंत टोलमुक्ती मिळणारच नाहीये. मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाचही टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका अद्याप होणार नाहीये. कारण या पाचही टोलनात्यांचे कंत्राट हे रद्द न करता येण्याजोगे एकत्रित पद्धतीचे करण्यात आलेले आहे.त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या कंत्राटदाराची करारात ठरलेली रक्कम त्याला मिळाल्याविना टोल रद्द होऊ शकणार नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं. 

मुंबईच्या वेशींवर असलेल्या दहिसर, मुलूंड, ऐरोली, वाशी तसंच लाल बहादूर शास्त्री मार्गावर टोल आकारला जातो. या पाचही टोलनाक्यांचे कंत्राट रद्द न करता येण्याजोगे आलेले आहे. सप्टेंबर 2027 पर्यंत मुंबईकरांना शहराच्या वेशीवरील पाचही टोलचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, अशी शक्यता आहे. 2002मध्ये हे पाचही टोलनाके सुरू करण्यात आले होते. मुंबईतील उड्डाणपूल आणि रस्ते देखभाल-दुरुस्ती खर्च म्हणून टोलनाके उभारण्यात आले आहेत. टोलनाक्यांसाठी एकत्रित करार करण्यात आल्याने करार रद्द होऊ शकत नाही, असं एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवरुन महिन्याला जवळपास लाखो वाहनांची वर्दळ होते. एका महिन्यात साधारण कोट्यवधी रुपयांमध्ये टोलवसुली करण्यात येते. 

मनसेचे आंदोलन

राज ठाकरे यांनी टोलनाक्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राज्यात फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नसेल तरीही वसुली झाल्यास टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. टोल हा राज्यातला सर्वात मोठा स्कॅम आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. राज्यात केवळ व्यावसायिक वाहनांना टोल असल्याची माहिती काल फडणवीस यांनी दिली होती. हे जर खरं असेल तर कारकडून टोल वसुली करू देणार नाही, नाहीतर टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.