टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हे बोलण्यापेक्षा...'

Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली असून, आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असंही ते म्हणाले.   

शिवराज यादव | Updated: Jul 26, 2023, 01:14 PM IST
टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हे बोलण्यापेक्षा...' title=

Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली आहे. टोलनाका फोडणं राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका अशी टीका भाजपाने केली आहे. त्यातच आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही लक्ष्य करत रस्त्यांची दुरावस्था हे त्यांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. 

"अमित महाराष्ट्रभर दौरा करत असून टोलनाके फोडत चालला आहे असं नाही. गाडीला फास्टटॅग असूनही त्याला थांबण्यात आलं होतं. तो मी टोल भरल्याचं सांगत असतानही फोनाफोनी झाली. समोरचा माणूस उद्धटपणे बोलल्याने ती आलेली प्रतिक्रिया आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं. 

'मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव'; राज ठाकरेंची नितीन गडकरींवर जाहीर नाराजी

 

पुढे ते म्हणाले, "भाजपाने हे बोलण्यापेक्षा निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्र करु अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं सांगावं. म्हैसकर यांना नेहमी टोलचं काम मिळतं. तो कोणाचा ला़डका आहे. ही टोलची प्रकरणं काय आहेत. तसंच समृद्धी महामार्गावर तुम्ही रस्ता बनवताना दोन्ही बाजूंनी फेन्सिंग टाकलेलं नाही. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 400 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. याची जबाबदारी भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार घेणार का? फेन्सिंग न लावता तुम्ही सगळा महामार्ग लोकांसाठी सुरु केलात. तिथे कुत्रे, हरिणी, गाई रस्त्यावर येत आहेत. स्पीडमध्ये जाणार आणि अपघातत मरणार ही काही सरकारची जबाबदारी नाही का? पूर्वकाळजी घेण्याआधी टोल बसवत आहात. म्हणजे लोकांच्या जगण्या, मरण्याची काही काळजी नाही". 

"रस्त्यांची स्थिती किती घाणेरडी आहे. लोकांना पाच-पाच सहा तास लागतात. नाशिकवरुन माझे मित्र आले, त्यांना सात तास लागले. सगळीकडे खड्डे पडलेत, रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आहे. मग तुम्ही कसले टोल वसूल करत आहात, रोड टॅक्स कसला घेत आहात? याबद्दल सरकार, भाजपा काही बोलणार आहे का? पालकमंत्र्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

नितीन गडकरींवर टीका

"17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री मराठी आणि महाराष्ट्रातील असूनही राज्यातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैव आहे," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 

नितीन गडकरी नेहमी मोठमोठे आकडे सांगत असतात. मग इतक्या अभ्यासू नेत्याचं हे अपयश आहे का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की "हे त्यांचं महाराष्ट्रातील अपयश आहे. मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्षं लागतात, हे मोठं अपयश आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग 14 महिन्यात बांधली गेली होती. रामायणात तर वनवासाच्या 12 वर्षांच्या संपूर्ण कालावधीत सेतू बांधला होता. आपल्या वांद्रे वरळी सी लिंकला 10 वर्षं लागली आहेत. बहुधा तेच पुढारलेले होते".