Aurangabad to Be Renamed: छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

Aurangabad to Be Renamed: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करणाऱ्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  लवकरच मोठं आंदोलन छेडणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे-भाजप सरकारला इशारा देत खासदार जलील यांनी नव्या नावाचा देखील पर्याय सुचवला आहे.

Updated: Feb 28, 2023, 06:14 PM IST
Aurangabad to Be Renamed:  छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल  title=

Aurangabad to Be Renamed:: औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार जलील यांनी औरंगाबादसाठी नवीन नाव सुचवलं आहे. खासदार जलील नामांतर विरोधात कडाडून विरोध केला आहे. तसेच त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. केंद्र सरकारने (Central Government) औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे औरंगाबाद  (Aurangabad) शहर आणि जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) करण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे. मात्र, खासदार जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद शहराच्या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मलिक अंबर यांच्या नावावरून औरंगाबादचे नाव अंबराबाद करून टाका, असा देखील पर्याय खासदार जलील यांनी सुचवला आहे. फक्त बाळासाहेब आले. राजनीतीचं दुकान उघडलं ते म्हणाले, मी या शहराचे नाव संभाजीनगर करणार. या वरून त्यांनी 30 वर्षे घाणेरडे राजकारण केलं, असा घणाघाती आरोप देखील खासदार जलील यांनी या वेळी केला.  

बिहारमध्ये पण एक औरंगाबाद आहे. तिथं भाजपचे खासदार आहे. मग ते औरंगाबाद भाजपला चालते का? या अधिवेशनात ठराव घ्या.. आणि नाव बदलून टाका. तुम्हाला औरंगाबाद नको म्हणून तुम्ही महापुरुषांच्या नावात बदल केला. आता या शहरांचाही करुन घ्या. जी 20 साठी शहर सजवले. मात्र, दोन 2 दिवस शहर सजवून काय साध्य केले. शहराच्या नामांतराला माझा विरोध कायम आहे. मात्र, याचा जाती धर्माशी संबंध नाही. काही लोकं जाणिवपूर्वक मुद्दा भरकवट आहेत. आम्ही औरंगजेबसोबत नाव जोडतो म्हणून आम्ही पाकिस्तानात जावे, असेही लोक आम्हाला सांगतात. 

मी सगळ्या जातीधर्माचा खासदार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय सबंध आहे कुणी सांगावे, असा सवाल देखील खासदार जलील यांनी केला आहे. त्यावरून या शहराचे नाव का बदलणार. शहरांच्या नावाला तसा काहीही अर्थ नाही. म्हणून, कोल्हापूरच नाव छत्रपती शाहू नगर करा, पुणे - फुले नगर अथवा फुले करा फक्त नागपूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर असं करा. कारण तिथं दीक्षाभूमी आहे. मुंबई या नावाला ही अर्थ नाही. या शहराला , छत्रपती शिवाजी राजे महानगर नाव करा. मालेगावला मौलाना आबाद नाव करा असे खासदार जलील यांनी सुचवले. 

नाव बदलताना काही इतिहास संबंध असायला हवा, असं मत त्यांनी मांडले. मलिक अंबर या शहरात आला. इथं पिण्याचं पाणी आणलं, आज जे उडताय त्यांच्या बाप दादांनी हे मलिक अंबर ने आणलेलं पाणी पिऊन मोठं झाले आहेत, अशा शब्दांत खासदार जलील यांनी टीका केली. 

प्रकरण कोर्टात असताना निर्णय कसा घेतला?

राज्य सरकारने औरंगाबादच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा मुद्दा हायकोर्टात उपस्थित करण्यात आला होता. प्रकरण कोर्टात असताना निर्णय कसा घेतला? देशात हुकूमशाही आहे की लोकशाही आहे, असा सवालही खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे. अनेक लोक नामांतरमुळे नाराज झाले आहेत.  या निर्णयामुळे तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी याचा विरोध करू शकतो, हा माझा अधिकार आहे आणि विरोध करणार अशी ठाम भूमिका जलील यांनी मांडली आहे.