असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०

महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार...

Updated: May 31, 2020, 07:22 PM IST
असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.० title=
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु १ जूनपासून सुरु झाला आहे. लॉकडाऊनबाबत राज्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे महाराष्ट्राने लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला आहे. या लॉकडाऊनमध्ये टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यात आली आहे. ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

३ जूनपासून खालील बाबींमध्ये शिथिलता -

या लॉकडाऊनमध्ये कंटेंन्मेंमट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता असणार आहे. ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांचा वापर करता येणार, मात्र दूर जाण्यास मनाई आहे. सायकलिंगची परवानगीही देण्यात आली आहे.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी, गॅरेजही सुरु करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती ५ टक्के इतकी होती. 

५ जूनपासून खालील बाबींमध्ये शिथिलता -

मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषम तारखेला समोरच्या रस्त्यावरील दुकाने खुली राहणार आहेत.  

कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार, दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची आहे. यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे सांगण्यात आले आहे. खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत, अथवा सायकलने जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई, तसेच खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. 

अत्यावश्यक सेवेसाठी एक टॅक्सी चालक २ प्रवासी, एक रिक्षा चालक २ प्रवासी, खाजगी चारचाकी १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

८ जूनपासून खालील बाबींमध्ये शिथिलता -

८ जूनपासून सर्व खाजगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी, उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय, कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार, राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार आहे.

संपूर्ण राज्यात खालील बाबींवर बंदी कायम - 

- शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
- मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
- स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

उर्वरित राज्यात - (मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्र)

- परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही
- खुली स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत
- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही
- जिल्हा अंतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
- सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी, मात्र गर्दी आढळल्यास बंद करण्याचा इशारा

सरकारची भूमिका

लॉकडाऊन जसा टप्प्याटप्प्याने लावला तसा तो आता एकदम उठविण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत आपण लॉक डाऊन चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे हा आदेश एका अर्थाने अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे असे सांगतो आणि म्हणूनच याला आपण "मिशन बिगीन अगेन" असे म्हणत आहोत