"मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू"

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला आहे. शरद पवारांचे (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची साथ कशी काय सोडली असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2023, 07:36 PM IST
"मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू" title=

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल (Prafull Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला आहे. त्यातही शरद पवारांचे (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य करताना दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आले होते असा खुलासा केला. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.

दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड म्हणाले "ज्या मुलाला हातावर बाळासारखं हातावर खेळवलं त्याने असं करावं. नियतीने यापेक्षा मोठा त्रास शरद पवारांना काय द्यावा. तो सर्वात लाडका विद्यार्थी होता. दिलीप म्हटलं की सगळं बाजूला. शरद पवारांना ह्रदय नाही असं वाटतं का? शरद पवारांनी मला दिलीपही मला जायचं आहे असं सांगून गेला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्या डोळ्यात एक अश्रू दिसत होता. इतका माणूस निष्ठूर नसतो". 

Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

 

"आपल्या घरात 12 वर्षं सोबत राहिलेला कुत्रा मेल्यावरही आपण जेवत नाही.  कुत्रा काही बोलत नसतो, मागत नसतो. पण सहवास नावाची काही गोष्ट आहे की नाही? प्रेम, सहवास यंच्या काही व्याख्या आहेत की नाही. सत्ता हीच व्याख्या असेल तर माणुसकीचा अंतच झाला. सत्तेसाठी सर्व काही ही व्याख्या जगाला माणुसकी बुडवणारी आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

'शरद पवारांची चूक'

शरद पवार की अजित पवार चूक नेमकी कोणाची? असं विचारण्यात आलं असता जितेंद्र आव्हाड यांनी प्रेमाची चूक असल्याचं सांगितलं. "काही गोष्टी आपण प्रेमापोटी करत असतो, हीच चूक असते. आपल्या घऱातही अशा अनेक गोष्टी घडत असतात. शरद पवारांकडून ही प्रेमाची चूक झाली. बोट ठेवेल ते मिळालं अशी एकच व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात होती ती म्हणजे अजित पवार. शरद पवारांमुळे अजित पवारांना सहजासहजी मिळत गेलं," असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.  

'अजित पवारांशी वैर नाही'

"अजित पवार आणि माझ्यात काही वैर नाही. आमचं चांगलं जमायचं. दिल्लीत आम्ही हसत गप्पा मारताना तुम्ही पाहिलं असेल. माझ्या हाऊसिंगच्या कामावर ते खूश होते. ते नाराजीही बोलून दाखवायचे. त्यांचा मैत्री करण्यासारखा स्वभाव आहे. आमचं पटत नव्हतं असं काही नाही. पण माझं आणि शरद पवारांचं वेगळं नातं आहे. पुरंदरेंच्या वेळी सगळे टीका करत असताना त्यांनी सर्वांच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली होती हे कसं काय विसरु शकतो," असं आव्हाड म्हणाले.