एसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा

ST strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे.  

Updated: Nov 11, 2021, 08:42 AM IST
एसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा title=
संग्रहित छाया

मुंबई / पुणे / नागपूर :  ST employees strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे. या संपामुळे (ST bus strike) एसटीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आधीच एसटी तोट्यात आहे. एसटी संपामुळे एसटी महामंडळाचे  जवळपास 100 कोटींचे नुकसान झाले आहे. काल 63 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. (Loss of Rs 100 crore for ST: Current situation in Maharashtra, support of strike private bus drivers at Pune)

या संपामुळे आतापर्यंत जवळपास 100 कोटींचे नुकसान झाले असून संपामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, पुण्यातील खासगी वाहतूकदारांनी मोठा निर्णय घेतला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी खासगी वाहतूक बंद करणार  आहे. दहानंतर खासगी बसेसही एसटी आगाराच्या बाहेर पडणार आहेत. पुण्यातील एसटी कर्मचा-यांचा संपाचा आज चौथा दिवस आहे. रात्री सर्व आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेटच्या बाहेर काढले. तसेच रेस्ट हाऊसही बंद केल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

एसटी कामगारांच्या संपाबाबत आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेतलीय. संपक-यांना वारंवार आवाहन करूनही माघार न घेतल्यामुळे सरकार बघ्याची भूमिका घेणार नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आंदोलक कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

पुणे विभागातील 26 कर्मचाऱ्यांचे निलंबन 

पुणे विभागातील 26 कर्मचाऱ्यांचे काल रात्री उशिरा निलंबन करण्यात आले. संपकरी कर्मचाऱ्यांना बस स्थानकावरील विश्राम कक्ष तसंच स्वच्छता गृह वापरास मनाई करण्यात आलीय. तोडगा निघत नसल्यानं निषेधार्थ आज मुंडण आंदोलन करण्यात येणारेय. बस स्थानकातून पोलीस तसंच परिवहन अधिका-यांच्या निगराणीत खासगी बसेसची वाहतूक सुरु आहे. 

13 दिवसांपासून एसटीचे वेळापत्रक 

प्रवाशांच्या वर्दळीमुळे गजबजणाऱ्या सोलापूर एसटी स्थानकात दोन दिवसांपासून प्रवासी फिरकेनासे झालेत. अनेकजण स्थानाकाबाहेरून खासगी वाहनानेच प्रवास करणं पसंत करतायेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागच्या 13 दिवसांपासून एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने बस स्थानकं अक्षरक्ष: ओस पडलीयेत. 

नागपुरात संप चिघळला

नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलाय. नागपुरातल्या आणखी 46 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. मंगळवारीही 18 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान गेल्या चार दिवसात संपामुळे महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झालंय. एसटीची चाकं थांबल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत.

भंडारा येथे एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने

राज्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप,निदर्शनं सुरु आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासामोर आपल्या हक्काच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरू केली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर डेपोतील 10 एसटी कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आलं. हे निलंबन रद्द करण्यात यावं आणि आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. 

यवतमाळ : संपकरी 57 कर्मचाऱ्यांना निलंबित 

यवतमाळमध्ये सरकारनं संपकरी 57 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतरही संप सुरूच आहे. सरकार दडपशाही करत असेल तर उद्रेक होईल असा इशाराही आंदोलक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव यासह जिल्ह्यातील सर्वच आगारातल्य़ा एसटी फे-या बंद झाल्यायत. 

कामगारांसह कुटुंबातील लोकही रस्त्यावर

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एसटी कामगारांसह कुटुंबातील लोकही रस्त्यावर उतरले आहेत. आंबेजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागील आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. कामगारांच्या मागण्यांसाठी कुटुंबातील सदस्यही मोर्चात सहभागी झाले आहेत. 

 एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन

चंद्रपुरात एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. 13 कामगारांचे निलंबन केले होते. त्याचा निषेध केला. मुंबईत बसलेल्या एसटी कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी कामगार हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.  कामगार हिताला बाधक असलेल्या कर्मचारी नेत्यांना अंतिम निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नका, असा इशारा संपकर्त्यांनी दिला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष 

नांदेडमध्ये संपात सहभागी 58 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  या निलंबनानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा कर्मचा-यांनी दिलाय.  31 ऑक्टॉबरपासून जिल्ह्यात एसटीची एकही बस धावलेली नाही.