Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.   

सायली पाटील | Updated: Apr 1, 2024, 12:35 PM IST
Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?  title=
Loksabha Election 2024 mahayuti ajit pawars ncp secures nashik and dharashiv seats says sources

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या सत्रातील निवडुकीसाठीच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली असली तरीही काही केल्या महायुतीमध्ये चार जागांवर असणारा तिढा काही केल्या सुटण्याचं नाव घेत नव्हता. पण, अखेर हे क्लिष्ट गणितही सुटलं असून, आता दोन महत्वाच्या मतदार संघांतून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील चार जागांपैकी दोन जागांवरील तिढा अखेर संपला आहे. धाराशिव येथून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर नाशिकमधून छगन भुजबळ यांना संधी देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

हेसुद्धा वाचा : Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष 

 

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून सातत्यानं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव पुढे केल्याचं पाहायला मिळालं, तर महायुतीकडून या मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याच्या माहितीला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तेव्हा आता शिंदे गटातील गोडसेंचं काय होणार हाच प्रश्न उभा राहत आहे. 

भुजबळांच्या अडचणीत वाढ 

दरम्यान, दिल्लीतील महाराष्ट्र सदनासंदर्भातील घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हं आहेत. ज्या प्रकरणामधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्याच प्ररणी आता अंजली दमानिया यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. त्यामुळं या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयात नेमकी कोणाच्या बाजूनं सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.