Maharastra Politics : राष्ट्रवादीत परतीचे वारे? शरद पवारांच्या पक्षात 'इनकमिंग'? जयंत पाटील म्हणतात...

Jayant Patil Statement : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू होणार का? असा सवाल विचारल्यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात काय उत्तर दिलं? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Jun 6, 2024, 06:37 PM IST
Maharastra Politics : राष्ट्रवादीत परतीचे वारे? शरद पवारांच्या पक्षात 'इनकमिंग'? जयंत पाटील म्हणतात... title=
Jayant Patil Statement On Incoming MLA from Ajit Pawar Faction

Ajit Pawar Faction : 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणत शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवली अन् 10 पैकी 8 जागा जिंकल्या. पवारांच्या या विजयी स्ट्राईकनंतर आता राष्ट्रवादीत (NCP Crisis) मोठा भूकंप होऊ घातलाय, अशी चिन्ह दिसत आहेत. कारण अजित पवार गटातल्या आमदारांना परतीचे वेध लागल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलीय. अशातच जेव्हा जयंत पाटील (Jayant Patil) यांना आमदारांच्या इनकमिंगविषयी विचारलं गेलं तेव्हा त्यांनी एका वाक्यात खेळ खल्लास केला.

लोकसभा निकालानंतर अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचा मेसेज पाठवल्याचीही माहिती आहे. घरवापसीसाठी अजित पवार गटाचे आमदार प्रयत्न करत असल्याचा दावा रोहित पवारांनीही केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातले दोन आमदार शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय . राज्यातली परिस्थिती मविआला अनुकूल असल्याने शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतल्याचं समजतंय तेव्हा लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा, आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी जयंत पाटील यांना केला. यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे एवढंच सांगतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसत असल्याचं बोललं जातंय. एवढंच नाही तर अजित पवारांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला पाच आमदार गैरहजर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

दरम्यान, पक्षात आऊटगोईंग होणार असल्याच्या चर्चेनंतर अजित पवारही अॅक्शन मोडवर आलेत. आपल्या आमदारांच्या त्यांनी बैठकाही घेतल्यात. मात्र लोकसभा निकालात झालेला पराभव, शरद पवारांना मिळालेलं यश, त्यामुळे आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे.