गणेशोत्सव : मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षीत प्रवासासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Updated: Aug 29, 2019, 04:37 PM IST
गणेशोत्सव : मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी title=
संग्रहित छाया

मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षीत प्रवासासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून या काळात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. दरम्यान, वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडा या मार्गावरुन अवजड वाहने धावणार नाहीत.

या वाहनांना वगळण्यात आलेय

गणपती उत्सव लक्षात घेता एसटी महामंडळानेही कोकणातील विविध भागात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडल्या आहेत. गणेशभक्तांचा हा प्रवास वाहतुकीच्या कोंडीशिवाय सुखकर आणि सुरक्षीत होण्याच्या दृष्टीने या काळात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. मात्र ही निर्बंधबंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसणार आहे.   

महामार्गाच्या रुंदीकरण तथा रस्ता दुरुस्तीच्या कामकाजाचे साहित्य, माल इत्यादीची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू नसेल. तथापी, या वाहतुकदारांनी संबंधीत वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच जयगड पोर्ट येथे आयात केलेल्या युरीयाच्या सुरळीत पुरवठ्याकरिता महामार्गावरील निवळी ते हातखंबा दरम्यानच्या युरीया खत वाहून नेणाऱ्या वाहनांनाही वाहतूक बंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या कालावधीत असणार  बंदी

ही वाहतूक बंदी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तसेच १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कालावधीत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

तसेच ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर व ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांना सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस पूर्णत: बंदी राहील. या कालावधीत नमूद वाहनांना रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील.

३० ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.